Friday, January 17, 2014

आपण सारे जोडलेले


परिसर विज्ञान जीवनाचं शास्त्र आहे. हे शास्त्र सांगतं की, मानवासह कोणताही सजीव हा एकटा नाही. तो एक फार मोठय़ा नैसर्गिक व्यवस्थेचा छोटासा भाग आहे. जॉन डाने (John Donne) नावाचा लेखक लिहितो ‘माणूस समुद्रातल्या बेटासारखा सुटासुटा मुळीच नाही, तो उपखंडाचा एक भाग आहे’. परिस्थितीकी शास्त्र सांगते, आपण सारे एका अशा बृहद् व्यवस्थेचा भाग असतो, ज्याला परिसंस्था म्हटले जाते. परिसंस्थेत अनेकानेक जीव एकमेकांशी, आसपासच्या अजैविक घटकांशी संबंध ठेवून जगत असतात. आपण निसर्गापासून वेगळे आहोत. हा दुराभिमान माणसाला कधीना कधी केवळ मनस्तापच देतो.
एक झेन कथा मला नेहमीच आवडत आली आहे. एका झेन सद्गुरुच्या बागेत भोपळ्याचा वेल बहरला होता. सकाळी उठून साधूनी बघितलं की, लागलेल्या सर्व भोपळ्यांमध्ये भांडण सुरू आहे. त्याने विचारलं, काय झालं? भांडण का सुरू आहे? 
भोपळ्यांनी उत्तर दिलं, ‘आमचं आपआपसात पटत नाही. आम्ही काय करावं?’ 
साधू म्हणाला, ‘ध्यान करा’. 
भोपळे म्हणाले, ‘आम्ही भोपळे आहोत. ध्यान कसे करणार?’ तेव्हा साधू ध्यान मंडपात ध्यानस्त बसलेल्या अनेक लोकांकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाले, ‘बघा, आश्रमात सर्व भोपळे ध्यान करत आहेत’. सर्व भोपळे ध्यान करायला लागले आणि पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली की, आपण सर्वजण तर एकाच वेलीनी एकमेकांशी जोडलेली आहोत. आपण सर्वजण एकाच व्यवस्थेचा भाग आहोत. शंका मिटली शांतता निर्माण झाली.
ब्रिटिश संशोधक लव्हलॉक (james Lovelock) याने १९७० च्या दशकात एक सिद्धांत मांडला. ‘गाइया’ (Gaia) हे त्या सिद्धांताचे नाव गाइया सिद्धांत हा आपल्या प्राचीन भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचाच आधुनिक आविष्कार आहे. प्राचीन ग्रीक पुराणांमध्ये गाइया नावाची देवता होती. जिला वसुंधरा म्हटल्या जाई. गाइया सिद्धांत म्हणजे संबंध सजीव सृष्टीच्या नाते- संबंधाचा, परस्परावलंबन तत्त्वाचा, आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत, पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण त्या सर्वाना स्पर्श करणारे पृथ्वीचे वातावरण, त्यांना जीवन देणारे पाणी आणि सूर्याची ऊर्जा हे स्रोत समान आहेत.
पृथ्वीवर जीवनाची सुरुवात ३.५ अब्ज वर्षांआधी झाली असावी, असे विज्ञान मानते. सुरुवातीचे जीव अगदीच साधे आणि सारखे दिसणारे होते. पण, अनेक वर्षांच्या उत्क्रांती नंतर आजची विविधतेने नटलेली पृथ्वी आपल्याला दिसते. यासाठी पृथ्वीला ३.५ अब्ज वर्षां अविरत मेहनत करावी लागली लागत आहे.
जीवाच्या पेशीचा अथवा जीवाच्या मोठय़ा समूहाचा अभ्यास केला तर काय जाणवते?  सहजीवन आणि परस्पर सहकार्य या दोन गोष्टीतूनच या पृथ्वीवर विविधतेने नटलेली अशी सृष्टी साकार झाली आहे. पेशीचा आकार तो केवढा? अगदी डोळ्यांनी दिसणार नाही इतपत छोटा. तरीसुद्धा पेशीच्या आत ज्या क्रिया चालतात त्या परस्पर सहकार्याचं एक उत्तम उदाहरण ठरावं अशा आहेत.

उत्क्रांती शास्त्रात को- इव्होल्यूशन (Co- evolution) नावाची संज्ञा आहे. याचा अर्थ दोन जीवांची एकत्रितरीत्या (सोबत सोबत) झालेली उत्क्रांती. फुलांचे सुंदर रंग का आहेत? कारण त्यांना परागीकरणासाठी फुलपाखरांना आकर्षित करायचे असते. म्हणजेच सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांती सोबतच कीटकांची सुद्धा समृद्ध अशी जीवसृष्टी उत्क्रोंत झाली.
शेती हा सुद्धा मानव निर्मित एक परिसर संस्था आहे. विविध पिके, त्यावरील कीटक, त्या किटकांवर अवलंबून असलेले अन्य कीटक, जमीनीतले जीवाणू अशा सर्व घटकांपासून बनलेल्या व्यवस्थेत मात्र गेल्या काही दशकात प्रचंड मानव निर्मित बदल आपण केले. कीटकनाशकांच्या अवाजवी वापराने शेतीला दुष्पपरिणाम पोहोचवणारे कीटक निर्माण झालेच पण, त्याच वेळी शेतीवर अवलंबून असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्षी, सस्तन प्राणी यांचेही नुकसान झाले. शेतीत नांदणारी संपूर्ण अन्न साखळीच आपण विस्कळीत करून टाकली. व्यवस्थेत खिळ बसली.
निसर्गशास्त्राची मदत घेऊन आणि निसर्गाला समजून घेऊन आता मानव- मानवातील परस्पर संबंधांचा फेरविचार करण्याची गरज आहे. केवळ सहभागानेच विकास करता येऊ शकतो. भाषेचा, जातीच्या, धर्माच्या नावाने विभाजन करून काहीही शक्य होणार नाही. निसर्गातील सहजीवन, सहभाग, परस्पर सहकार्य, गाइया सिद्धांत सह-उत्क्रांती याना समाजशास्त्रांनी व एकूणच मानव जातीने समजून घेतले व त्यानुसार जर आपले मार्ग ठरवले तर एक सशक्त आणि युद्ध विरहित मानवतेचा जन्म आपण घडवून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. सशक्त असा निसर्ग नावाचा शिक्षक आपल्या आसपास आहेच.

No comments:

Post a Comment