Tuesday, December 13, 2016

भारतीय विविधता आणि गुंतागुंतीला न समजुन घेणारं सरकार

अर्थशास्त्र, परिस्थितीकी शास्त्र, पर्यावरण शास्त्र या सारखी शास्त्रे गुंतागुंतीच्या व्यवस्थांचा (complex systems) अभ्यास करणारी शास्त्रे आहेत. त्यात अर्थशास्त्र तर आणखीच गुंतागुंतीच शास्त्र आहे कारण त्यावर मानवी भावना, मानसाची वागण्याची पद्धत, संस्कृती इत्यादी घटक परिणाम करतात. भल्या भल्या नोबेल पारितोषीक अर्थशास्त्रज्ञाला सुद्धा बरेचदा एखाद्या देशाचं अर्थशास्त्र पुढच्या क्षणी काय स्वरुप धारण करेल हे सांगता येत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की अर्थशास्त्र हे अगणित घटकांवर अवलंबून असलेलं शास्त्र आहे. त्या सर्व घटकांमधील सहसंबंधाची कोरीओग्राफी समजून घेणे महाकठीण कार्य असते. त्यामुळे खरी अर्थशास्त्राची, पर्यावरण शास्त्राची जाण असणारे शास्त्रज्ञ किंवा राज्यकर्ते कधीच एकच एक असा कठोर कायदा, नियम, घोषणा करुन टाकत नाहीत, तर घ्यायचा निर्णय हा लवचीकपणे टप्या टप्यात, संपूर्ण तयारीनीशी घेतात. असं जर केलं नाही तर फसणारा निर्णय एका मोठ्या लोकसंखेचं, भूभागाचं प्रचंड नुकसान करुन जातं.

“अर्थशास्त्राबद्दलची मानवी समज ही अपूर्ण असल्यामुळे राज्यकर्त्यांचा अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध हा नेहमी प्रयोगात्मक असायला हवा (Experimental). ज्यावेळी आपली गाठ ही गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या प्रश्नांशी असते त्या वेळी आपण अनुरुप व्यवस्थापनाच्या (Adaptive management) तत्वांचा अंगीकार करायला हवा. अनुरुप व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेण्यातली लवचिकता. अनुरुप व्यवस्थापन हे अर्थशास्त्रीय धोरणाला/निर्णयाला प्रयोगात्मकता प्रदाण करते. अनुरुप व्यवस्थापनाचे धोरण हे मानवाच्या क्रियाकलापांमूळे बदललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल स्पष्टपणे स्थापित केलेल्या सिद्धांताचा पडताळा घेते (उदा. काळा पैसा खरच केवळ चलणाच्या स्वरुपात असतो काय? केवळ चलन रद्द केल्याने काळ्या पैशाचे प्रश्न सुटतात काय? इत्यादी). जर असे अनुरुप व्यवस्थापनावर आधारलेले निर्णय यशस्वी झाले तर सिद्धांत सत्याचं स्वरुप घेतो. सोबतच  धोरण जर अयशस्वी झाले तरी अनुरुप व्यवस्थापण त्या अपयशापासून शिकण्यासाठी जागा ठेवते जेणे करुन भविष्यकालिन निर्णय हे चांगल्या समजाच्या आधारावर घेता येतात.” (काई एन ली ने त्याच्या “कंपास अंड गायरोस्कोप” नावाच्या ग्रंथात पर्यावरणीय व्यवस्थांबद्दल जे लिहलं आहे त्याचा अर्थव्यवस्थेला लागू पडेल असा केलेला मी स्वैर विचार!).

नोटा बंदीच्या निर्णयात अशी प्रयोगात्मकता, अभ्यास, दूरदृष्टी, नियोजन कुठेच दिसत नाही. एकप्रकारची सनसनाटी निर्माण करुन काळ्या पैशाच्या बाबतीत प्रस्थापीत केलेल्या सिद्धांताची पडताळणी घेण्याची नियोजनहीन खेळी मात्र दिसून येते. भारतासारख्या विविधतेच्या आणि गुंतागुंतीच्या देशात राहणा-या करोडो लोकांशी हुकुमशाही पद्धतीने केलेला हा प्रयोग वाटतो. हा निर्णय भारतीय विविधतेचा सन्मान करत नाही, भारतीय व्यवस्थांमधली गुंतागुंत मान्य करत नाही. येणारे दिवस भारतीय शेतकरी, मासेमार, आदिवासी, मजूर, भटक्या जमाती या सर्वांसाठी अतीषय कठीण दिवस असणार आहेत.      

Tuesday, March 1, 2016

मानवी सभ्यता नष्ट का होतात?
डॉ. नीलेश हेडा

मिसोपोटेमीयाची समृद्ध शेती व्यवस्था दर्शवनारं चित्र.

मानवी सभ्यतांच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर जाणवते की प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनात झालेल्या नाशामुळे अनेक माणवी सभ्यता लयास गेल्या आहेत. मानवी इतीहास हा नैसर्गिक संसाधनांच्या मानवा करवी केलेल्याहासाचा पण त्याच वेळी काही माणवी गटांद्वारे निसर्गाच्या केलेल्या संवर्धनाचा आणि संसाधने लयाला गेल्याने उद्भवलेल्या माणवी गटांगटांमधील संघर्षाचा इतिहास आहे. माणवी इतिहासात एका विशिष्ट अशा प्रभावशाली गटाने नेहमीच निसर्गाचे शोषन केल्याचे दिसून येते.
सुमारे १० हजार वर्षांपुर्वी माणूस हा शिकार करुन आणि कंदमूळे गोळा करुन आपला उदरनिर्वाह करायचा. सुमारे १० हजार वर्षांआधी प्रथमत: पृथ्वीवरील शितयुगाचा अंत होऊन हिम खंड वितळायला लागले आणि माणसाने शेती करायला आणि पशुपालन करायला सुरुवात केली. माणसाचे भटकंतीच्या जीवन शैलीपासुन शेतक-याच्या भूमिकेत जाण्याने अनेक बदल निसर्गात व्हायला लागले. शेतीची सुरुवात झाल्याने गावे वसायला लागली. अन्नाची शाश्वती वाढल्याने व्यापार वृद्धींगत व्हायला लागला. शहरे वसल्याने कारखानदारीचा उत्कर्ष व्हायला लागला. माणवी सभ्यता हळुहळू उत्र्कांत आणि विकसीत व्हायला लागली
साधारणत: समकालीन असलेल्या मिसोपोटॅमीया (Mesopotamia) (५३०० ख्रि.पूर्व), इजिप्त (३१५० ख्रि.पूर्व), भारतात सिंधू (ख्रि.पूर्व ३३००-१४००) आणि चिन मध्ये अतिषय उत्कर्षाला पोहोचलेल्या माणवी संस्कृतींचा जन्म झाला. ह्या सर्व पुरातन संस्कृतींमधले सारखेपण म्हणजे ह्या नद्यांच्या सुपीक अशा खो-यांमद्ये उदयास आल्या आणि खास करुन शेतीच्या प्रगतीमूळे आणि अनुकूल पर्यावरणामुळे उत्कर्षाला पोहोचल्या. सद्याच्या इराक, सायरीयाचा काही भाग, दक्षीण तुर्कचा काही भाग आणि इरानच्या काही भागात पसरलेल्या टिग्रिस (Tigris) आणि युफ्रॅटेस (Euphrates) नद्यांच्या खो-यात मिसोपोटॅमीया संस्कृतीचा उदय झाला. नाइल नदीच्या खो-यात इजिप्तच्या संस्कृतीचा उदय झाला, भारतात सिंधू नदीच्या खो-यात सिंधू संस्कृतीचा उदय झाला (सिंधूच्या काठचे लोक हिंदू!) त्याच वेळी चिन मध्ये सुद्धा यलो नदी आणि यांगत्से ( Yellow River and theYangtze River valleys) नदीच्या खो-यात माणवी संस्कृतींचा उदय झाला. ह्या सर्व सभ्यता शेतीच्या ज्ज्ञानाच्या बाबतीत अतीषय पुढारलेल्या होत्या. त्यांच्यात धातू शास्त्र, कुंभार काम, लाकुड काम, जनावरांना पाळीव बनवण्याचे ज्ज्ञान, वैद्यकशास्त्र, जोतीष्य, ग्रहता-यांचे ज्ज्ञान विपूल प्रमाणात होते. कलेच्या बाबतीतही ह्या सभ्यता आपल्या उत्कर्षाला पोहोचल्या. मात्र यात एक साम्य होते आणि ते म्हणजे पर्यावरणात झालेल्या बदलामुळे (ज्यात माणवी कारणांचा महत्त्वाचा सहभाग होता) ह्या सभ्यता आपल्या अस्ताला गेल्या.
ह्या सर्व सभ्यता नद्यांच्या सुपीक अशा खो-यात जन्माला आल्या. भरपूर गाळाच्या जमीनीमूळे शेतीचा उत्कर्ष झाला. अन्न धान्याची चिंता मिटल्यामुळे लोक संख्या भरपूर वाढायला लागली. लोकसंख्या वाढल्याने नैसर्गिक संसाधनांवरचा तान वाढायला लागला. जंगले घटत गेली. प्राण्यांचे अधिवास नष्ट व्हायला लागले. जंगले तोडली गेल्याने मातीची धुप व्हायला लागली. सुपीक माती वाहुन जाणे, जमीनीवरचा तान वाढणे इत्यादी कारणांनी शेतीची सुपीकता कमी व्हायला लागली. जंगले नष्ट झाल्याने मलेरियाचे प्रसारक असलेल्या डासांनी आपला जंगलातील अधिवासांना हलवून माणवी वस्त्यात आपले बस्तान बसवले आणि माणवी वस्त्यात हिवताप झपाट्याने पसरला. असे म्हणतात की सिकंदरच्या सैन्याचा पराभव होण्याचे एक महत्त्वाचे कारण हे भारतातील हिवताप पसरवणारे डास होते कारण त्याच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणावर हिवतापाची लागन झाली होती. जुण्या काळात (३८० ख्रिस्तपूर्व) नैसर्गिक संसाधनांचाहास झाल्याचे वर्णन प्लेटोने आपला देश अट्टीकाच्या संदर्भात केले आहे. तो म्हणतो, “आता फक्त मूळ देशाचे अवशेष मात्र शिल्लक आहेत….. जे शिल्लक आहे ते आहे केवळ विविध प्रकारच्या आजारांनी जर्जर झालेले शरीर ……संपूर्ण सुपीक माती वाहुन गेली आहे आता ह्या देशाची फक्त हाडे आणि कातडी वाचली आहे”.  
प्राचीन रोम हे निसर्ग संवर्धनाचे आणि त्याच वेळी त्याच्या नाशाचे विरोधाभासी उदाहरण आहे त्यांनी कालवे खोदून आणि तुषार सींचनासारख्या मार्गांनी जल संवर्धनाचे उत्तम काम केले पण त्याच वेळी जंगलातील संसाधनांच्या व्यवस्थापनात कमी पडले आणि ऐतिहासीक संशोधन सांगते की खास करुन जंगलाच्याहासामुळे रोमन साम्राज्य कोलमडले. कारण जल संसाधन असो की शेती संसाधन त्याचा जंगलाशी घणीष्ट असा संबंध असतो. जंगलांचाहास झाला की आपोआपच जंगली जनावरांचा शेतीला त्रास वाढतो, जंगले ही जल संवर्धनातही मोलाची भूमिका बजावतात, जंगलाच्या कमतरतेमुळे मातीची मोठ्या प्रमाणावर धुप होते आणि नद्या गाळाने भरुन नद्यांचा नाश होतो. प्राचीण रोम मध्ये असचं घडलं असावं.
भारताच्या सिंधू नदीच्या काठी (आता बराचसा भाग पाकिस्तान मध्ये) सिंधू संस्कृतीचा उदय झाला. ह्या संस्कृतीला नांगराचा उपयोग माहित होता. व्यापारात हे लोक पारंगत असल्याने ह्या लोकात साक्षरतेचे प्रमाणही असल्याचे पुरावे आहेत. खास करुन खंडाच्या सरकण्याने, हिमालयाच्या वाढीमुळे आणि सिंधू नदी मध्ये झालेल्या मानव निर्मित बदलामुळे सिंधू आणि इतर नद्यांनी आपले मार्ग बदलवले आणि नदीत प्रचंड गाळ साचल्याने सिंधू नदीचे पात्र कीतीतरी फुटाने वर उचलल्या गेले (वर्तमान काळात गेल्या दोन वर्षांआधी बिहार मध्ये कोसीने असाच आपला मार्ग बदलवला आहे). उपग्रह चित्रांनी हे स्पष्ट झाले आहे की, सतलज नदी सिंधू नदीला मिळण्यासाठी पश्चिमेकडे सरकली आणि यमुना पुर्वेकडे सरकून गंगेला मिळाली परिणामत: सरस्वती लुप्त झाली. यात एक महत्त्वाचा बदल हा सुद्धा झाला की पुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. परिणामत: अतीषय उन्नत अशी सिंधू संस्कृती लयाला गेली. साधारणत: अशीच परिस्थिती मिसोपोटॅमीया आणि चिनच्या संस्कृती बद्दल घडली.
संस्कृतीच्या बाबतीत आपण आज उत्कर्षावर आहोत. माणवी तंत्रज्ज्ञान, कला, शेती, व्यवस्थापन आपल्या चरम सिमेवर पोहोचले आहे. मात्र त्याच वेळी नैसर्गिक संसाधनांच्या शोषनाच्या बाबतीत, अती उपयोगाच्या बाबतीत आणि त्याच्या चुकीच्या नियोजनाच्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत. भरपूर प्रमाणात जंगल तोडले जाणे, मातीची धुप होणे, नद्यांचा प्रदुषनाने आणि अती शोषनाने मृत्यू होणे, नद्यांचे नैसर्गिक मार्ग बदलून पुरांचे धोके वाढणे, शेतीची सुपीकता कमी होणे, पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर विष पेरल्या जाणे, अनेक प्रजाती संपून जाणे, परदेशी प्रजातींच्या द्वारे स्थानीक प्रजातींचे अस्तीत्व धोक्यात येणे, पृथ्वीचे तपमान वाढून धृवांवरचा बर्फ वितळणे, मांन्सुनचे चक्र बदलने अशा विविध कारणांनी सद्याची अत्यंत उत्कर्षाला पोहोचलेली माणवी सभ्यता नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत इतिहासापासुन प्रेरणा घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे कारण इतिहास हा वारंवार स्वत:ची पुनरावर्ती करतो, तो पुनरावर्ती यासाठी करतो कारण आपण इतिहासापासुन शिकत नाही. मिसोपोटेमीया, इजिप्त, सिंधू आणि चिनच्या संस्कृतीच्याहासाच्या पुनरावर्ती टाळल्या जाऊ शकते.

(लेखक पर्यावरण अभ्यासक असुन राकफेलर फाउंडेशन चे फेलो आहेत)