Thursday, January 16, 2014

आदिवासींचे निसर्ग संवर्धन
डा. निलेश हेडा

आदीवासी आणि निसर्गावर अवलंबुन असणारे लोक संसाधनांचा अती उपयोग करतात काय? गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा लेखा ह्या गोंड आदिवासींच्या गावात दोन वर्ष वास्तव्यास असतांना या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. आणि उत्तर आहे नाही. या उलट आदिवासी निसर्गाचं संरक्षणच करत आले आहेत याचाही उलगडा झाला.
या संबंधात लोपेज, माधव गाडगीळ सारख्या काही शास्त्रज्ञानी केलेले अभ्यास मला आठवले. आदिवासी जीवनात संसाधनांचा अतीवापर संभवत नाही असं ते म्हणतात. जीथे आदिवासी आहेत तीथे तीथे जंगल अजुनही टिकुन आहे या पेक्षा मोठा पुरावा आणखी काय असु शकतो! दोन तीन कारणांनी आदिवासी संसाधनांचा दुरुपयोग, अतीउपयोग करत नाहीत, एक म्हणजे संसाधन मिळवण्याच्या ज्या पारंपारीक पद्धती आहेत त्या फारच साध्या असतात, कितीही प्रयत्न केला तरी एका विशीष्ट काळात त्या पद्धतींनी फारसं काही हाती लागत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, संसाधनांवर अवलंबुन असणारी लोकसंख्या. गडचिरोली जिल्ह्यात किंवा अन्य ही आदिवासी क्षेत्रात लोकसंखेची घनता अन्य भागाच्या तुलनेत फारच कमी आहे, त्याचाही परिणाम एकुणच संसाधन कमी वापरण्यात होत असतो.
तीसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या संसाधनांचा उपयोग करण्याची पद्धती ज्याला परीस्थितीकी शास्त्रात ’मल्टीपल रिसोर्स युज स्ट्रॅटेजी’ (Multiple Resource Use Strategy) असे म्हणतात. एकाच प्रकारच्या संसाधनांवर लोक जर अवलंबुन असले तर ते विविक्षित संसाधन हा हा म्हणता संपुण जावू शकते, पण वापरायला अनेक प्रकारची संसाधनं उपलब्ध असल्याने निसर्गचक्रात सर्वच संसाधनांचा वापर एका नंतर एक करता येतो. ज्या वेळी एक प्रकारचे संसाधन फळण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले असते तेंव्हा अन्य संसाधनांचा विकल्प उपलब्ध असल्याने पहिल्या संसाधनाला फळन्यासाठी (प्रजननासाठी) बरीच उसंत मिळालेली असते. 
चौथी गोष्ट आहे, संचय करुन न ठेवण्याची मानसीकता. मेंढ्यात संसाधनांचा संचय करायची मानसीकता मला कधीही दिसली नाही. वर्तमान काळात जगणारे हे लोक; महाविरांचा अपरिग्रहाचा सिद्धांत माहित नसुनही लोक अपरीग्रह नामालुमपणे करतात.
आणि पाचवी गोष्ट आहे, संसाधनांचा विवेकशील उपयोग करण्याला कारणीभूत असणारे अलीखीत सामाजीक नियम, परंपरा व धार्मिक समजुती.
निसर्गावर आश्रीत असलेले लोक पारंपारीक पद्धतीत दोन स्तरांवर निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न करतात असे अभ्यासक मानतात. एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर, म्हणजे एखाद्या प्रजातीला अभय प्रदान करणे. उदा. माकडाला भारतातल्या बहुतांश भागात अभय प्रदान केलेलं आहे किंवा वडा पिंपळाच्या झाडांना कापण्यावर बंदी केलेली असते. दुसरी पातळी म्हणजे, परिसंस्थेच्या पातळीवर. उदा. देवराया आणि पवित्र कुंड. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. इथल्या झाडांना तोडायला बंदी असते. पवित्र तळ्यातील मास्यांना किंवा पाणपक्षांना पकडण्यावर धार्मिक बंदी असते. प्रजातीच्या पातळीवर; काही प्रजातींना पवित्र मानने, काही प्रजातींचा उपयोग धार्मिक व मंगल कार्यात करणे, काही विशिष्ठ वयात काही प्रजातीना न खाने, काही विशीष्ठ काळातच प्रजातींचा उपयोग करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 
मेंढ्यातील गोंड लोकात विविध गोत्राचे (आडनावांचे) लोक विविध प्रकारच्या प्राणी वनस्पतीना देव मानतात, ज्याला इंग्रजीत ’टोटेमीक स्पेसीज’ असे म्हणतात. भारतात अंदाजे ३००० च्या आसपास विविध लोकसमुह आहेत. त्यातील जवळ जवळ १००० जनजाती ह्या वनस्पती प्राण्यांना देव मानतात. गोंड लोक हे मुळत: निसर्ग पुजक आहे. गोंड लोकात विविध आडनाव असणाऱ्या लोकांचे विविध देव असतात. ते साधारणत: वनस्पती किंवा प्राणी असतात. लोक समजतात की त्यांच्या कुल देवतेच्या प्रजातींपासुन त्यांचा वंश पुढे चालत आला आहे. आपल्या कुलदेवतेला लोक खात नाहीत किंवा कोणतीही इजा करत नाही.
उदाहरणार्थ ’हलामी’ आडनावाच्या लोकांनी बोद मासा खावू नये असा नियम आहे तर ’नैताम’ आडनावाच्या व्यक्तिंनी कासव, ’दुगा’ हे सापाला देव मानतात तर ’हिचामी’ एक प्रकारच्या किटकाला, ’गावडे’ निल गाईला माता मानतात तर ’कुमोटी’ आंब्याच्या झाडाला इत्यादी इत्यादी. मेंढ्यात प्रत्येक आडनावाच्या व्यक्तिचे कोणते देव आहेत याची मी यादी तयार केली, तेंव्हा मी आच्छर्यचकीत झालो, कारण अगदी किटकांपासुन तर सस्तन प्राण्यांपर्यंत प्रत्येक वंशाचे आपले देव होते. अशा प्रकारे विविध गटांनी (विविध वंशाच्या लोकांनी) काही विशिष्ठ प्रजातींना अभय देण्याचं काय कारण असावं? कारण अगदी सोपं आहे, एका विशीष्ठ गटाने एखादी प्रजात वापरली नाही म्हणजे ती इतरांना वापरायला मोकळी असते त्यामुळे एकाच प्रजातीवर येणारा सर्व लोकांचा ताण कमी होतो.
ज्या प्रमाणे काही विशीष्ठ प्रकारच्या प्रजाती काही आडनावाचे लोक खात नाहीत (इजा करत नाहीत) तसच काही विशीष्ठ वयातल्या व्यक्तिनी काही विशीष्ठ प्रकारचे प्राणी खावू नये असा प्रवाद आहे. उदा. लग्नाआधी करीयाल उसीड, बेहरा किडेर (सुतार पक्षी), काकड (पानकावळा) इत्यादी पक्षी खावू नये असा दंडक आहे.
आपण विचार करुया की जर फळं परिपक्व होण्याआधीच लोकांनी एकमेकात स्पर्धा करुन ती तोडायला सुरुवात केली तर एकतर चांगल्या प्रतिची फळं ही मिळणार नाही आणि निसर्गाचही नुकसान होईल. या साठी काही विशिष्ठ तीथी नंतरच एखादी विशिष्ठ गोष्ट वापरावी असा अलिखीत नियम मेंढ्यात आहे. उदा. चिचोडा भाजी (एक प्रकारची जंगली भाजी), आवळा, करवुल माटी (एक प्रकारचा जंगली खाद्य कंद) ह्या गोष्ठी चुरनाच्या (चुरना = धान कापणी व मळनी) आधी (= डिसेंबर जानेवारी) खाउ नयेत असा नियम आहे. तर पळसवेल, वराली (एक प्रकारची जंगली भाजी), चहा डोडो आखाडी (जुलै - आगस्ट) च्या पुर्वी खात नाहीत. आदिवासी समाजात पोलोची प्रथा पाळली जाते. पोलो म्हणजे सुट्टीचा दिवस. त्या दिवशी कोणतेही शेतीकाम किंवा अन्य काम करत नाही, त्या दिवशी देवपुजा केली जाती. बऱ्याच प्रजाती ह्या पोलो नंतरच वापरल्या जातात.
आता आपण विविध प्रकारच्या आधिवासाच्या पातळीवरच्या निसर्ग संवर्धनाच्या पारंपारीक प्रयत्नांचा आढावा घेउ. आधुनिक समाजात सरकारी प्रयत्नांनी घोषीत केलेले वन्य जीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं इत्यादी असतात. आदिवासी समाजातही काही जागांना त्यातील विविध जीवजातींसह अभय दिलेलं असतं. यातला पहिला प्रकार म्हणजे देवराई. अशी एक देवराई मेंढ्यातही आहे. यातला दुसरा प्रकार असतो पवित्र तळी किंवा डोह. ह्या दृष्टीने मेंढ्याच्या लगतहुन वाहणाऱ्या कठाणी नदीवरील ’देवुर कुंडी’, ’वादादीन’, ’देव डोह’ सारख्या ठिकाणी लोक मासे पकडत नाहीत. अशी ठिकाणं म्हणजे माश्यांसाठी एक प्रकारची अभयारन्ये (की अभयाकुंडे!) असतात.
अशा प्रकारे अजूनही भारतातल्या अनेक भागात पारंपरिक पद्धतीने निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्य प्रवाहातल्या समाजाने निसर्गाला वाचवण्यासाठी या सर्व निसर्ग मित्रांपासुन शिकण्याची गरज आहे.
                                                                                               
डा. नीलेश हेडा,
संवर्धन, कारंजा (लाड)
(०९७६५२७०६६६)

(लेखक रुफोर्ड मारीस फाउंडेशन, लंडन चे नदी अभ्यास व संरक्षणाच्या बाबतीतले फेलो आहेत).

No comments:

Post a Comment