Tuesday, May 26, 2020


मा. श्री. नितिनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा.
27.05.2020

ग्रामिण भागात विकेंद्रित स्वरुपात रोजगार निर्मितीच्या बाबतीतली आपली तळमळ दूरदृष्टीच्या अनुषंगाने आपल्या वाढदिवसाचे निमित्य साधुन ग्रामीण रोजगार बळकटीकरणाच्या दिशेने एका लोक चळवळीचा जन्म व्हावा या दृष्टीने एक अत्यंत संक्षिप्त टिपन आपल्या वाढदिवसाची भेट म्हणूनआपल्या शुभहस्ते शुभारंभ.
  
स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या द्वारे विकेंद्रित रोजगार निर्मितीच्या लोक चळवळीचा श्रीगणेशा

डॉ. निलेश हेडा आणि सचिन कुळकर्णी
संवर्धन समाज विकास संस्था, कारंजा लाड, जि. वाशिम ४४४१०५
ग्रिन्झा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. आणि परिवर्तन ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.
9765270666, 9421745233 www.samvardhan.org.in

1.  प्रस्तावना

भारत पारंपरिक खाद्य पदार्थांच्या बाबतीत विविधतेने संपन्न असा देश आहे. या पारंपरिक खाद्य पदार्थांच्या अनुषंगानेच एका अत्यंत पुढारलेल्या खाद्य संस्कृतीचा जन्म इथे झाला आहे. स्थानिक नैसर्गिक संसाधने, ऋतू, पोषण मुल्य, चव अशा सर्व बाबींचा सांगोंपांग विचार करुनच गेल्या हजारो वर्षांमध्ये इथली खाद्य संस्कृती विकसीत झालेली दिसते. मात्र गेल्या काही दशकांमध्ये या स्थानिक खाद्य पदार्थांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊन अनेक पारंपरिक खाद्य पदार्थ विलुप्तीच्या मार्गावर आहेत. अशा स्थानिक खाद्य पदार्थांचे आंतर्राष्ट्रीय माणकांवर सांगोपांग अभ्यास होऊन स्थानिक बचत गट, महिला मंडळे, शेतकरी उत्पादक कंपण्यांच्या द्वारे बाजारपेठेत स्थान मिळऊन देणे स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. स्थानिक खाद्य पदार्थांचा शोध घेणे, त्यांच्या निर्माण प्रक्रियेचा अभ्यास करुन बाजार पेठेच्या दृष्टीने त्यांचे प्रमाणीकरण करणे, त्यातील पोषण मुल्यांचा अभ्यास करणे, त्यांचे ब्रांडींग करणे व बाजार पेठेत त्याला स्थान मिळावे म्हणून प्रयत्न झाल्यास विकेंद्रित स्वरुपात एक मोठेच रोजगाराचे दालन ग्रामिण भागात निर्माण होऊ शकते. त्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील स्थानिक खाद्य प्रकारांच्या बाबतीत प्रक्रिया उभी करण्याचा आमचा मानस आहे.

धेय्य
खाद्य विविधतेची वाढत चाललेल्या गरजेची पुर्ततेच्या दृष्टीने प्रयत्न करणे. छोटे व सिमांत शेतक-यांना शाश्वत अन्न चळवळीचा भाग बनऊन शेती उत्पादनाना फायदा मिळऊन देणे. पोषण मुल्यांच्या शाश्वततेसाठी अन्न विविधतेला प्रमोट करणे. पोषन मुल्यांनी परिपुर्ण असे अन्न वाजवी दरात सगळ्यांना कसे मिळेल याची तजवीज करणे.

2.  उद्दीष्ट्ये

1.    वाशिम जिल्ह्यातील विविध प्रकारच्या स्थानिक, पारंपरिक खाद्य पदार्थांची जंत्री तयार करणे.
2.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेचा डेटाबेस तयार करणे व त्याच्या पोषण मुल्यांची तपासणी करणे.
3.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेचे प्रमाणीकरण करणे (standerdization) जेणे करुन भविष्यकालीन बाजार पेठेकरीता एक प्रकारच्या खाद्य पदार्थांचा पुरवठा करता येईल.
4.    उपरोक्त खाद्य पदार्थांच्या बाबतीत ग्रामिण भागात विकेंद्रित पद्धतीने महिला बचत गट इत्यादींच्या सहाय्याने मुल्य साखळी (Value chain) निर्माण करणे.
5.    शेतकरी उत्पादक कंपनीच्या द्वारे विकेंद्रित पद्धतीने निर्माण झालेल्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचे संकलन, आकर्षक पॅकींग, ब्रांडींग व विक्रीची अत्याधुनिक व्यवस्था उभारणे.
6.    स्थानिक उपलब्ध नैसर्गिक संसाधन व पिक पद्धतींवर स्थानिक खाद्य व्यवस्था उत्क्रांत झालेली असल्याने नैसर्गिक संसाधने (उदा. चारोळी, मोहा फुल, गोडंबी इत्यादी) स्थानिक ठिकाणी कसे वाढतील तसेच शेतातील विविधता कशी बळकट होईल याची लोक चळवळ उभारणे.

3.  नेमकं कसं करता येईल?

1.    सद्या वाशिम जिल्ह्यापासुन सुरु करता येईल. सर्व प्रथम विविध गावांमधील, विविध जन जातींमध्ये प्रचलीत पारंपरिक खाद्य पदार्थांचा शोध घेणे.
2.    त्या खाद्य पदार्थांच्या स्थानिक निर्माण प्रक्रियेची माहिती गोळा करणे.
3.    त्या सर्व खाद्य पदार्थांच्या निर्माण प्रक्रियेकरीतासमान निर्माण प्रक्रिया” (Standard Operating Protocol) चे निर्माण करणे.
4.    निवडक खाद्य पदार्थांच्या पोषण मुल्यांचा डेटा बेस निर्माण करणे.
5.    निवडक खाद्य पदार्थांच्या निर्मितीकरीता विकेंद्रित स्वरुपात गावागावांमध्ये व्यवस्था निर्माण करणे. यात खास करुन महिला बचत गट, महिला मंडळांचा सहभाग निश्चित करणे. निर्माण केलेल्या सर्व व्यवस्था मोबाईल अप सारख्या साधनांनी केंद्रिय व्यवस्थेशी (उदा. शेतकरी उत्पादक कंपनी) जोडणे. केंद्रिय ठिकाणी एकत्रिकरणाची व्यवस्था निर्माण करणे.
6.    शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या द्वारे निवडक खाद्य पदार्थांचं ब्रांडींग करणे. आकर्षक पॅकेजींग करणे. आधुनिक मार्केटींगच्या साधनांचा वापर करुन पुरवठा साखळी निर्माण करणे.

4.  यातुन काय निष्पन्न होईल?

1.    स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या बाबतीत एक इत्यंभुत डेटा बेसचे निर्माण होईल.
2.    स्थानिक ठिकाणी मोठा रोजगार निर्माण होईल. या रोजगाराच्या प्रक्रियेत ग्रामिण भागातील खासकरुन स्त्रिया, युवक, बाहेरुन ग्रामिण भागात परत आलेले स्किल्ड कामगारांचा उपयोग करुन घेता येईल.
3.    स्थानिक पारंपरिक खाद्य पदार्थांच्या पोषण मुल्यांच्या बाबतीत माहिती निर्माण होऊन, ब्रांडींग होऊन  त्यांच्या राष्ट्रिय तसेच आंतर्राष्ट्रीय बाजार पेठेत जागा मिळवण्याच्या बाबतीत मार्ग सुकर होईल.
4.    पारंपरिक खाद्य पदार्थात मुल्यवर्धन होऊन त्यांच्या साठी लागणा-या पारंपरिक मात्र सद्या विलुप्त होत असलेल्या पिकांच्या लागवडी करीता प्रयत्न केल्यास जैवविविधतापुर्ण पिक पद्धती पुन्हा नव्याने पुनरस्थापीत करता येईल.
   

Friday, November 24, 2017

संस्मरण - राजस्थान


बदलाचं वारं वाहतय 


डा. निलेश हेडा

या वेळी राजस्थानच्या ग्रामिण जीवनाला जवळून बघता आलं. तशीच बकाली, भंणगलेपणा. गरीबी. अभाव. भारतीय गावं स्वत:सोबत अनेकानेक शाप घेऊन जन्माला आलेली वाटतात. पण स्थानिक संस्कृती त्या अभावावर, गरीबीवर चंदनाच्या लेपाचं काम करते, हे राजस्थानच्या ग्रामिण जीवनात मिसळून कळते. या वर्षी पुन्हा उत्तर राजस्थान मध्ये पाऊस नाही. विदर्भासारखीच परिस्थिती आहे. वातावरणातील बदलाचा मोठाच फटका ग्रामिण भारताला बसतोय. येणा-या काळात मोठीच उलथापालथ होणार असं दिसतं. पाणवठ्यांच्या कलेकलेने विकसीत झालेला हा समाज आहे ज्याला सुका आणि ओला दुष्काळ वाईट दिवस दाखवणार आहे. त्याच वेळी पाण्याबद्दल, निसर्गाबद्दल समज नसलेला आणि केवळ "वेग - सिमेंट - लोखंड - प्लास्टीक" यांनीच विकास होतो असं माननारा त्यांचा वर्तमान शाषक वर्ग हे आमच्या काळचं मोठच दुरदैव आहे.
पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत आपल्या पुर्वजांच्या पासंगातही आपण बसत नाही. जैसलमेर मध्ये गडीससार तलाव आहे. 1367 मध्ये रावल गडसी सिंघ या राजाने याचं निर्माण केलं. त्यावेळी जैसलमेरची लोकसंख्या ५००० होती. तसेच दररोज २००० उंटावर लादून विविध प्रकारचा माल घेऊन व्यापारी जैसलमेर वरुन आखाती देशात जायचे. या सर्वांना हा तलाव जीवन द्यायचा. या तलावाच्या काठावर एक पुर्णाकृती हत्ती चा दगडी पुतळा आहे. पावसाळ्यात हत्तीचे पाय पाण्यात बुडाले की शहरात दवंडी दिल्या जायची की आता एक वर्ष जैसलमेरला पाण्याची चिंता नाही. हत्ती पाण्यात बुडाला की तिन वर्ष चिंता नाही. हत्तीच्यावर घोड्याची प्रतिमा आहे. घोडा बुडाला की ५ वर्ष चिंता नाही. पाण्याच्या नियोजनाबद्दल खरचं काही गांभिर्यानं शिकायच असेल तर राजस्थान हा आपला गुरु आहे. 
या वेळची "नदी खोरे व्यवस्थापनाची" बॅच फार वेगळी होती. जी. बी. पंत इन्स्टिट्युट आफ टेक्नालाजीच्या बांधकाम अभियंत्यांच्या विद्यार्थ्यांना नदीचं परिस्थितीकी तंत्र समजून सांगायचं होतं. आजकालचे विद्यार्थी अतिषय चौकस आहेत. चांगलीच तयारी करुन मैदानात उतरावं लागतं.
शेवटच्या दिवशी अलवर जिल्ह्यातल्या भानगढ़ या प्राचिन उजाड शहराला भेट दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत याचा कारभार चालतो. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आमेरचे शासक राजा भगवंत दास याने या शहराची निर्मिती केली. राजा मानसिंहाचे बंधू माधोसिंह जे मुगलांचे प्रमूख सरदार होते त्यांनी या शहराला आपली राजधानी बनवलं. प्रत्येकाने एकदा तरी बघावं असं हे शहर. आखीव उजाड झालेल्या बाजारपेठा, सुंदर मंदीरं, व्यवस्थित प्लान केलेली घरं आपल्या पुर्वजांच्या सिटी प्लानिंगच्या सेंसचं उत्तम उदाहरण आहे. उपयोगीतेला सौंदर्याची किणार द्यायची अन्यथा कोणतीच निर्मिती करु नये हा अलिखीत नियम तेव्हा असावा. भारतातली सर्वात शापीत, भितीदायक जागा (The Most "Haunted" Place In India) असा याचा दुष्प्रचार केल्या गेल्यामुळे आता पर्यटकांची संख्या बरीच वाढलेली आहे ! मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भानगढ मधल्या सर्व आत्मा सुट्टीवर गेल्या होत्या! 
उत्तर राजस्थान मध्ये आजकाल प्रवासी गाड्यांमध्ये, पानटप-यांवर हरीयानवी भाषेतली पॉप रॉक या पाश्चात्य संगितात मिसळून बनवलेली शृंगार गिते प्रचंड लोकप्रिय होत आहेत. अगदी साधे साधे ग्रामिण शृंगारीक शब्द अन स्थानिक चाली मध्ये तयार केल्या जाणारी ही गाणी (उदा. तू रुप की भरी तिजोरी है, कोई परदेसी मारा जावेगा!) तालुका जिल्हा स्तरावरील युवक यु ट्यूब चॅनेल काढून त्यावर प्रकाशीत करत आहेत. हा वेगळ्याच प्रकारचा सांस्कृतीक बदल आहे. आपण युरोपीयन होतोय. भरपूर गाणी ऐकली ही. मजा आली. 
निलेश (सप्टेंबर २०१७)

संस्मरण - राजस्थान

नद्या वाचल्या तर सभ्यता तग धरुन राहील

डा. निलेश हेडा

यावेळी राजस्थानमध्ये नदी अभ्यासक्रमाची बॅच फार वेगळी होती. सॉफ्ट वेअर इंजीनीयर, आर्किटेक्ट, सि.ए. पी.एचडी चे विद्यार्थी इत्यादी बरेच जन होते. अशा विषयात प्राविण्य मिळवून सुद्धा निसर्गाबद्दल जाणून घ्यायची यांची इच्छा अचंबीत करणारी होती. सर्वांचा परिचय घेतांना त्यांच्या विभागात पावसाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत होतो. भारतभर ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचं सावट आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम आता स्थानिक स्तरावर दिसायला लागले आहेत. आपण मात्र शहामृग होऊन बसलोय. इथे अरावलीच्या पायथ्याशी बसून आम्ही पाण्याबद्दल चिंता करतोय आणि जवळच जयपुर मध्ये “मद्मावती” साठी हजारोने युवक आंदोलन करत आहेत. इतिहासाने युवकांचा मेंदू फारच वाईट पद्धतीने काबीज केलाय? निसर्गासाठी आंदोलनाचे दिवस सरलेत भारतात. आता पुन्हा "चिपको" "नर्मदा बचाओ" सारखी आंदोलनं घडेल की नाही माहित नाही. 
दुस-या दिवशी पंधरा सोळा विविध देशातुन आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांसोबत गप्पा मारता आल्या. युरोपातील लोक नद्यांबद्दल प्रचंड संवेदनशील आहेत. कोणे एके काळी मात्र तिथल्या नद्यांची परिस्थिती आपल्या पेक्षाही वाईट होती. सध्या आपण मात्र भारतीय नद्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील झालोय. नदीला माता बिता मानून आपण एक नंबरचे पाखंडी आहोत हेच सिद्ध करतोय. लंडन शहरातुन थेम्स वाहते. ३ सप्टेबर १८७८ रोजी थेम्स नदीत सुप्रसिद्ध लंडन ब्रिज जवळ The Princess Alice नावाचं जहाज बुडालं. त्यात ६५० लोक बुडून मरन पावले. त्यातल्या बहुतांश लोकांना पोहायला यायचं मात्र तरीही ते का बुडाले? त्याचं कारण हे होत की, त्या काळी थेम्स इतकी जास्त प्रदुषीत झाली होती की पाण्यातल्या विषारी वायूनेच लोकांचा अंत झाला (त्या काळी दररोज ७५ दसलक्ष इंपेरीयल गॅलन इतकं सांडपाणी थेम्स मध्ये सोडल्या जायचं. १ इंपेरीयल गॅलन =३.७८ लिटर). मात्र आजची थेम्स अतीषय निर्मळ अशी नदी आहे (मी स्वत: २०१२ मध्ये लंडन मध्ये हे अनुभवलय). 
चंबल ही भारतातली अतीषय निर्मळ अशी नदी म्हणून ओळखल्या जाते. तिचं पौरानीक नाव चर्मवंती (यज्ञात आहुती देण्यासाठी रांतीदेव या राजाने हजारो गाई बैलांची कत्तल केल्याने चामडं (चर्म) आणि रक्ताचे लोट या नदीत गेले म्हणून चर्मवंती हे नाव, असा महाभारतात संदर्भ आहे. पुर्वी हा शकुनी मामाचा प्रदेश होता. द्रौपदीच्या वस्त्रहरनाच्या वेळी तिने या प्रदेशातल्या लोकांना शाप दिला की चंबलचे पाणी जर तुम्ही वापरले तर तुमचं अहीत होईल आणि याच कारणामुळे चंबल अनेक शतकांपर्यंत स्वच्छ राहीली!). कोटा वरुन आलेले एक जन चंबलचं दुख: सांगत होते की आता चंबल पुर्वी सारखी राहिली नाही. कोटा शहरातील कचरा, प्लास्टीक, वाढत चाललेली शेती आणि त्यातुन नदीत जाणारा किटकनाशकांचा प्रवाह, वाढत चाललेले कारखाने आणि त्यातुन बाहेर पडनारं पाणी, मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या खाणकामाने चंबलचा घास घ्यायला सुरु केलीय. चंबल मगरींसाठी अत्यंत उत्कृष्ट अधिवास आहे. हीच कथा कमी अधीक प्रमाणात सगळ्यात भारतीय नद्यांची आहे. नागपूरवरुन प्रणय तिजारे नावाचा एक मित्र सामील झाला होता, नाग नदीच्या बाबतीत रिवर फ्रंट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचं त्याचं म्हणनं होतं. रिवर फ्रंट (अहमदाबादच्या साबरमती सारखं!) ने नद्या वाचतील ही फार मोठी अंधश्रद्धा गुजरात मॉडेल ने आपल्याला दिलीय. 
पुण्याचे विनोद बोधनकर सुद्धा या वेळी सोबत होते. अनेक वर्षांपासून विनोदजीं सोबत माझा वार्तालाप आहे. अतीषय संवेदनशील असं हे व्यक्तीमत्व. तिन दिवस दोघही सोबतच होतो. “सागरमित्र” म्हणून ते एक विद्यार्थ्यांसोबत अभीयान चालवतात. प्लास्टीकचं नियोजन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्लास्टीक हे नद्यांच्या मृत्यूचं महत्वाचं कारण आहे. हे सगळं प्लास्टीक शेवटी समूद्रात जातं आणि त्याचे मायक्रोफिल्मस चक्क जैवविविधतेच्या मध्ये जाऊन शरीराचा भाग बनतात. प्लास्टीक बद्दल खुप गांभिर्यानं विचार करण्याची गरज आहे.  
परततांना राजेंद्र सिंह सोबत होते. त्यांना भोपाळला उतरायचं होतं, मी पुढे नागपुरला उतरलो. रेल्वेत उशीरा पर्यंत गप्पा करत बसलो. राजेंद्र सिहांमध्ये पॅशन, करुणा, वात्सल्य असे सगळे गुण एकसाथ नांदतात. कंपॅशन शिवाय पॅशनला काही अर्थ नसतो हे त्यांच्या कडून शिकावं. भेटल्यावर किंवा निरोप घेतांना पाठीवर इतक्या मायेने हात फिरवतात की उगाच आपल्याला गहिवरुन येतं. भेटल्यानंतर घरातल्या सगळ्यांची चौकशी करणे, आमच्या सगळ्या मित्रांची आठवण ठेउन प्रत्येकाबद्दल विचारने हे त्यांच्या कडून सहज घडते. भोपाळला येतांना त्यांच्या जवळ एक अगदीच छोटीसी बॅग होती. भोपाळवरुन ते हैदराबादला जाणार, तिथुन भुवनेश्वर, तिथुन दिल्ली, आणि दिल्लीवरुन जर्मनी. एका छोट्याश्या बॅगमधल्या मोजक्या गोष्टींनी सगळ चालणार. इतकं साधेपण पाहून स्वत:चीच लाज वाटायला लागली.



Monday, February 13, 2017

Sustainable Agriculture - Crusaders


Ankush Bhende, Pimpalgaon

Babita Fulmali, Bhamdevi

Babita Lad, Malegaon

Bhalchandra Khairkar, Ladegaon

Chitra Gavande, Jamathi

Dinesh Kapate, Ladegaon

Dnyaneshwar Dhekade, Bambarda

Ganesh Sawarkar, Ladegaon

Jaishree Khade, Kamargaon

Lakshmi Kapasikar, Jamathi

Lalita Thotange, Pimpari Modak

Manju Thotange, Pimpari Modak

Sanjay Bhagat, Aurangpur

Sanjay Kapate, Ladegaon

Santosh Lad, Ladegaon

Suchita Dorak, Brahmanwada

Vandana Gajbhiye, Jamathi

Vimal Dupare, Bhamdevi 

Mahananda Wagh, Dongargaon




Tuesday, December 13, 2016

भारतीय विविधता आणि गुंतागुंतीला न समजुन घेणारं सरकार

अर्थशास्त्र, परिस्थितीकी शास्त्र, पर्यावरण शास्त्र या सारखी शास्त्रे गुंतागुंतीच्या व्यवस्थांचा (complex systems) अभ्यास करणारी शास्त्रे आहेत. त्यात अर्थशास्त्र तर आणखीच गुंतागुंतीच शास्त्र आहे कारण त्यावर मानवी भावना, मानसाची वागण्याची पद्धत, संस्कृती इत्यादी घटक परिणाम करतात. भल्या भल्या नोबेल पारितोषीक अर्थशास्त्रज्ञाला सुद्धा बरेचदा एखाद्या देशाचं अर्थशास्त्र पुढच्या क्षणी काय स्वरुप धारण करेल हे सांगता येत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की अर्थशास्त्र हे अगणित घटकांवर अवलंबून असलेलं शास्त्र आहे. त्या सर्व घटकांमधील सहसंबंधाची कोरीओग्राफी समजून घेणे महाकठीण कार्य असते. त्यामुळे खरी अर्थशास्त्राची, पर्यावरण शास्त्राची जाण असणारे शास्त्रज्ञ किंवा राज्यकर्ते कधीच एकच एक असा कठोर कायदा, नियम, घोषणा करुन टाकत नाहीत, तर घ्यायचा निर्णय हा लवचीकपणे टप्या टप्यात, संपूर्ण तयारीनीशी घेतात. असं जर केलं नाही तर फसणारा निर्णय एका मोठ्या लोकसंखेचं, भूभागाचं प्रचंड नुकसान करुन जातं.

“अर्थशास्त्राबद्दलची मानवी समज ही अपूर्ण असल्यामुळे राज्यकर्त्यांचा अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध हा नेहमी प्रयोगात्मक असायला हवा (Experimental). ज्यावेळी आपली गाठ ही गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या प्रश्नांशी असते त्या वेळी आपण अनुरुप व्यवस्थापनाच्या (Adaptive management) तत्वांचा अंगीकार करायला हवा. अनुरुप व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेण्यातली लवचिकता. अनुरुप व्यवस्थापन हे अर्थशास्त्रीय धोरणाला/निर्णयाला प्रयोगात्मकता प्रदाण करते. अनुरुप व्यवस्थापनाचे धोरण हे मानवाच्या क्रियाकलापांमूळे बदललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल स्पष्टपणे स्थापित केलेल्या सिद्धांताचा पडताळा घेते (उदा. काळा पैसा खरच केवळ चलणाच्या स्वरुपात असतो काय? केवळ चलन रद्द केल्याने काळ्या पैशाचे प्रश्न सुटतात काय? इत्यादी). जर असे अनुरुप व्यवस्थापनावर आधारलेले निर्णय यशस्वी झाले तर सिद्धांत सत्याचं स्वरुप घेतो. सोबतच  धोरण जर अयशस्वी झाले तरी अनुरुप व्यवस्थापण त्या अपयशापासून शिकण्यासाठी जागा ठेवते जेणे करुन भविष्यकालिन निर्णय हे चांगल्या समजाच्या आधारावर घेता येतात.” (काई एन ली ने त्याच्या “कंपास अंड गायरोस्कोप” नावाच्या ग्रंथात पर्यावरणीय व्यवस्थांबद्दल जे लिहलं आहे त्याचा अर्थव्यवस्थेला लागू पडेल असा केलेला मी स्वैर विचार!).

नोटा बंदीच्या निर्णयात अशी प्रयोगात्मकता, अभ्यास, दूरदृष्टी, नियोजन कुठेच दिसत नाही. एकप्रकारची सनसनाटी निर्माण करुन काळ्या पैशाच्या बाबतीत प्रस्थापीत केलेल्या सिद्धांताची पडताळणी घेण्याची नियोजनहीन खेळी मात्र दिसून येते. भारतासारख्या विविधतेच्या आणि गुंतागुंतीच्या देशात राहणा-या करोडो लोकांशी हुकुमशाही पद्धतीने केलेला हा प्रयोग वाटतो. हा निर्णय भारतीय विविधतेचा सन्मान करत नाही, भारतीय व्यवस्थांमधली गुंतागुंत मान्य करत नाही. येणारे दिवस भारतीय शेतकरी, मासेमार, आदिवासी, मजूर, भटक्या जमाती या सर्वांसाठी अतीषय कठीण दिवस असणार आहेत.      

Tuesday, March 1, 2016

मानवी सभ्यता नष्ट का होतात?
डॉ. नीलेश हेडा

मिसोपोटेमीयाची समृद्ध शेती व्यवस्था दर्शवनारं चित्र.

मानवी सभ्यतांच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर जाणवते की प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनात झालेल्या नाशामुळे अनेक माणवी सभ्यता लयास गेल्या आहेत. मानवी इतीहास हा नैसर्गिक संसाधनांच्या मानवा करवी केलेल्याहासाचा पण त्याच वेळी काही माणवी गटांद्वारे निसर्गाच्या केलेल्या संवर्धनाचा आणि संसाधने लयाला गेल्याने उद्भवलेल्या माणवी गटांगटांमधील संघर्षाचा इतिहास आहे. माणवी इतिहासात एका विशिष्ट अशा प्रभावशाली गटाने नेहमीच निसर्गाचे शोषन केल्याचे दिसून येते.
सुमारे १० हजार वर्षांपुर्वी माणूस हा शिकार करुन आणि कंदमूळे गोळा करुन आपला उदरनिर्वाह करायचा. सुमारे १० हजार वर्षांआधी प्रथमत: पृथ्वीवरील शितयुगाचा अंत होऊन हिम खंड वितळायला लागले आणि माणसाने शेती करायला आणि पशुपालन करायला सुरुवात केली. माणसाचे भटकंतीच्या जीवन शैलीपासुन शेतक-याच्या भूमिकेत जाण्याने अनेक बदल निसर्गात व्हायला लागले. शेतीची सुरुवात झाल्याने गावे वसायला लागली. अन्नाची शाश्वती वाढल्याने व्यापार वृद्धींगत व्हायला लागला. शहरे वसल्याने कारखानदारीचा उत्कर्ष व्हायला लागला. माणवी सभ्यता हळुहळू उत्र्कांत आणि विकसीत व्हायला लागली
साधारणत: समकालीन असलेल्या मिसोपोटॅमीया (Mesopotamia) (५३०० ख्रि.पूर्व), इजिप्त (३१५० ख्रि.पूर्व), भारतात सिंधू (ख्रि.पूर्व ३३००-१४००) आणि चिन मध्ये अतिषय उत्कर्षाला पोहोचलेल्या माणवी संस्कृतींचा जन्म झाला. ह्या सर्व पुरातन संस्कृतींमधले सारखेपण म्हणजे ह्या नद्यांच्या सुपीक अशा खो-यांमद्ये उदयास आल्या आणि खास करुन शेतीच्या प्रगतीमूळे आणि अनुकूल पर्यावरणामुळे उत्कर्षाला पोहोचल्या. सद्याच्या इराक, सायरीयाचा काही भाग, दक्षीण तुर्कचा काही भाग आणि इरानच्या काही भागात पसरलेल्या टिग्रिस (Tigris) आणि युफ्रॅटेस (Euphrates) नद्यांच्या खो-यात मिसोपोटॅमीया संस्कृतीचा उदय झाला. नाइल नदीच्या खो-यात इजिप्तच्या संस्कृतीचा उदय झाला, भारतात सिंधू नदीच्या खो-यात सिंधू संस्कृतीचा उदय झाला (सिंधूच्या काठचे लोक हिंदू!) त्याच वेळी चिन मध्ये सुद्धा यलो नदी आणि यांगत्से ( Yellow River and theYangtze River valleys) नदीच्या खो-यात माणवी संस्कृतींचा उदय झाला. ह्या सर्व सभ्यता शेतीच्या ज्ज्ञानाच्या बाबतीत अतीषय पुढारलेल्या होत्या. त्यांच्यात धातू शास्त्र, कुंभार काम, लाकुड काम, जनावरांना पाळीव बनवण्याचे ज्ज्ञान, वैद्यकशास्त्र, जोतीष्य, ग्रहता-यांचे ज्ज्ञान विपूल प्रमाणात होते. कलेच्या बाबतीतही ह्या सभ्यता आपल्या उत्कर्षाला पोहोचल्या. मात्र यात एक साम्य होते आणि ते म्हणजे पर्यावरणात झालेल्या बदलामुळे (ज्यात माणवी कारणांचा महत्त्वाचा सहभाग होता) ह्या सभ्यता आपल्या अस्ताला गेल्या.
ह्या सर्व सभ्यता नद्यांच्या सुपीक अशा खो-यात जन्माला आल्या. भरपूर गाळाच्या जमीनीमूळे शेतीचा उत्कर्ष झाला. अन्न धान्याची चिंता मिटल्यामुळे लोक संख्या भरपूर वाढायला लागली. लोकसंख्या वाढल्याने नैसर्गिक संसाधनांवरचा तान वाढायला लागला. जंगले घटत गेली. प्राण्यांचे अधिवास नष्ट व्हायला लागले. जंगले तोडली गेल्याने मातीची धुप व्हायला लागली. सुपीक माती वाहुन जाणे, जमीनीवरचा तान वाढणे इत्यादी कारणांनी शेतीची सुपीकता कमी व्हायला लागली. जंगले नष्ट झाल्याने मलेरियाचे प्रसारक असलेल्या डासांनी आपला जंगलातील अधिवासांना हलवून माणवी वस्त्यात आपले बस्तान बसवले आणि माणवी वस्त्यात हिवताप झपाट्याने पसरला. असे म्हणतात की सिकंदरच्या सैन्याचा पराभव होण्याचे एक महत्त्वाचे कारण हे भारतातील हिवताप पसरवणारे डास होते कारण त्याच्या सैनिकांना मोठ्या प्रमाणावर हिवतापाची लागन झाली होती. जुण्या काळात (३८० ख्रिस्तपूर्व) नैसर्गिक संसाधनांचाहास झाल्याचे वर्णन प्लेटोने आपला देश अट्टीकाच्या संदर्भात केले आहे. तो म्हणतो, “आता फक्त मूळ देशाचे अवशेष मात्र शिल्लक आहेत….. जे शिल्लक आहे ते आहे केवळ विविध प्रकारच्या आजारांनी जर्जर झालेले शरीर ……संपूर्ण सुपीक माती वाहुन गेली आहे आता ह्या देशाची फक्त हाडे आणि कातडी वाचली आहे”.  
प्राचीन रोम हे निसर्ग संवर्धनाचे आणि त्याच वेळी त्याच्या नाशाचे विरोधाभासी उदाहरण आहे त्यांनी कालवे खोदून आणि तुषार सींचनासारख्या मार्गांनी जल संवर्धनाचे उत्तम काम केले पण त्याच वेळी जंगलातील संसाधनांच्या व्यवस्थापनात कमी पडले आणि ऐतिहासीक संशोधन सांगते की खास करुन जंगलाच्याहासामुळे रोमन साम्राज्य कोलमडले. कारण जल संसाधन असो की शेती संसाधन त्याचा जंगलाशी घणीष्ट असा संबंध असतो. जंगलांचाहास झाला की आपोआपच जंगली जनावरांचा शेतीला त्रास वाढतो, जंगले ही जल संवर्धनातही मोलाची भूमिका बजावतात, जंगलाच्या कमतरतेमुळे मातीची मोठ्या प्रमाणावर धुप होते आणि नद्या गाळाने भरुन नद्यांचा नाश होतो. प्राचीण रोम मध्ये असचं घडलं असावं.
भारताच्या सिंधू नदीच्या काठी (आता बराचसा भाग पाकिस्तान मध्ये) सिंधू संस्कृतीचा उदय झाला. ह्या संस्कृतीला नांगराचा उपयोग माहित होता. व्यापारात हे लोक पारंगत असल्याने ह्या लोकात साक्षरतेचे प्रमाणही असल्याचे पुरावे आहेत. खास करुन खंडाच्या सरकण्याने, हिमालयाच्या वाढीमुळे आणि सिंधू नदी मध्ये झालेल्या मानव निर्मित बदलामुळे सिंधू आणि इतर नद्यांनी आपले मार्ग बदलवले आणि नदीत प्रचंड गाळ साचल्याने सिंधू नदीचे पात्र कीतीतरी फुटाने वर उचलल्या गेले (वर्तमान काळात गेल्या दोन वर्षांआधी बिहार मध्ये कोसीने असाच आपला मार्ग बदलवला आहे). उपग्रह चित्रांनी हे स्पष्ट झाले आहे की, सतलज नदी सिंधू नदीला मिळण्यासाठी पश्चिमेकडे सरकली आणि यमुना पुर्वेकडे सरकून गंगेला मिळाली परिणामत: सरस्वती लुप्त झाली. यात एक महत्त्वाचा बदल हा सुद्धा झाला की पुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. परिणामत: अतीषय उन्नत अशी सिंधू संस्कृती लयाला गेली. साधारणत: अशीच परिस्थिती मिसोपोटॅमीया आणि चिनच्या संस्कृती बद्दल घडली.
संस्कृतीच्या बाबतीत आपण आज उत्कर्षावर आहोत. माणवी तंत्रज्ज्ञान, कला, शेती, व्यवस्थापन आपल्या चरम सिमेवर पोहोचले आहे. मात्र त्याच वेळी नैसर्गिक संसाधनांच्या शोषनाच्या बाबतीत, अती उपयोगाच्या बाबतीत आणि त्याच्या चुकीच्या नियोजनाच्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत. भरपूर प्रमाणात जंगल तोडले जाणे, मातीची धुप होणे, नद्यांचा प्रदुषनाने आणि अती शोषनाने मृत्यू होणे, नद्यांचे नैसर्गिक मार्ग बदलून पुरांचे धोके वाढणे, शेतीची सुपीकता कमी होणे, पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर विष पेरल्या जाणे, अनेक प्रजाती संपून जाणे, परदेशी प्रजातींच्या द्वारे स्थानीक प्रजातींचे अस्तीत्व धोक्यात येणे, पृथ्वीचे तपमान वाढून धृवांवरचा बर्फ वितळणे, मांन्सुनचे चक्र बदलने अशा विविध कारणांनी सद्याची अत्यंत उत्कर्षाला पोहोचलेली माणवी सभ्यता नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत इतिहासापासुन प्रेरणा घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे कारण इतिहास हा वारंवार स्वत:ची पुनरावर्ती करतो, तो पुनरावर्ती यासाठी करतो कारण आपण इतिहासापासुन शिकत नाही. मिसोपोटेमीया, इजिप्त, सिंधू आणि चिनच्या संस्कृतीच्याहासाच्या पुनरावर्ती टाळल्या जाऊ शकते.

(लेखक पर्यावरण अभ्यासक असुन राकफेलर फाउंडेशन चे फेलो आहेत)