Sunday, June 7, 2015

ग़ढा मंडला: प्रेमात पाडणारं ठिकाण

डॉ. निलेश हेडा
वेरियर एल्विन ह्या जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञाच्या आत्मकथेत वारंवार मंडल्याचा उल्लेख यायचा. गोंड आदिवासींसोबत काम करायला लागल्यावर गोंडांच्या साम्राज्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. गोंडांच्या एकुणच साम्राज्य विस्ताराचा विचार करतांना वारंवार मंडला हे ठिकाण मनात घिरट्या घालायचं. योगायोगानेच का होईना ह्या शहराच्या, तिथल्या व्यक्तिंच्या प्रेमात पडलो.  
मध्यप्रदेशच्या इशान्येला, मध्यभारतातल्या निबिड अशा पाणगळीच्या जंगलाने व्यापलेला, कधीतरी गोंड राजांच्या अल्ट्रामॉडर्न राज्यकारभाराने अन पराक्रमाने शहारलेल्या अन नर्मदेच्या विशाल पात्राने सिंचित झालेला मंडला जिल्हा आणि मंडला शहर हे जिल्ह्याच ठिकाण. २००५ मध्ये मी पहिल्यांदा ह्या शहरात गेलो अन नंतर अनेक वेळा जातच राहिलो. नागमोड्या नर्मदेच्या कुशीत वसलेलं, राणी दुर्गावतीच्या शौर्यानं अन गोंडी साम्राज्याच्या स्वर्णिम इतिहासाची साक्ष पटवणारं हे शांतीप्रिय ठिकाण. नागपूरवरुन सिवणी मार्गे मंडल्याला जातांना आसपासचा निसर्ग झपाट्याने बदलत जातो. नागपूरच्या आसपासचा उजाड प्रदेश पाणगळीच्या जंगलाने अन उंच बांधाच्या भातशेतीने हळूहळू परिवर्तित व्हायला लागला की समजावं आता आपण दंडकारण्यात प्रवेश केला आहे. गाडी पेंच व्याध्र प्रकल्पामधून जायला लागली की मला मोगलीची आठवण येते. रुडयार्ड किपलींगच्या जंगल बूकपुस्तकामध्ये वर्णीत हा प्रदेश. सिवणी हे जिल्ह्याचं ठिकाण, जागोजागी इंग्रज साम्राज्याच्या खुणारेषा अजूनही अंगावर बाळगणार हे ठिकाण. सिवणीवरुन एक राष्ट्रीय महामार्ग जबलपुरकडे निघतो अन दुसरा मंडल्याकडे. तसं सिवणी मंडला हे अंतर (११५ कि.मी.) फार नाही पण वाईट रस्ते आणि दळणवळणाच्या सोइंच्या अभावाने फार अखरतो.
मंडला शहर नर्मदा नदीच्या विशाल पात्राने दोन भागात विभागलं गेल आहे. एकदा का दोन्हीच्या मध्ये असलेल्या विशाल पुलावर आपली गाडी आली की प्रवासातला सारा तान नर्मेदला बघून निघून जातो. एखाद्या प्राचीन, ऐतिहासिक नगरीत तर आपण प्रवेश करत नाही आहोत ना आणि लगेच दोन घोडेस्वार येऊन गढा मंडला में राणी दुर्गावती की और से आपका स्वागत है”, असं तर म्हणनार नाही ना अशी शंका येते.
मंडला शहर हे नर्मदेचं शहर आहे. शहराचे सारेच संदर्भ, इतिहास, संस्कृती, सनवार, नवस, उत्सव, प्रत्येक ऋतू, प्रेयसी प्रियकराच्या आणाभाका आणि जगण्याचा शिण आलेल्या जीवांचं अंतिमस्थान ह्या नर्मदेशी जोडलेले. शहरासाठी नर्मदा फक्त नर्मदा नाही, “मां नर्मदाआहे. शहराचा प्रत्येक भाग हा ह्या नर्मदेशी नेहमीच संपर्कात असल्यासारखा असतो. सहस्त्रधारा, हाथी घाट, जेल घाट, उर्दू घाट, वैद्य घाट, महन्तवाडा घाट,  हे सारे घाट सदैव सुमत्स्य, कच्छ, नक्र, चक्र, चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदेच्या जयघोषाने आंदोलीत होत असतात. वर्ध्याच्या पवणार आश्रमात गंगेची सुंदर मूर्ती आहे तशीच एक रेखीव, मगरेच्या वाहनावर बसलेल्या नर्मदेची मूर्ती मंडला जवळच्या पुरवा गावात आहे.
मी नदी प्रेमी, माश्यांचा अभ्यासक त्यामुळे मंडल्याला पोहोचलो की तडक घाटावर जातो. ढिमर, मल्लाह, केवट हे पारंपरिक मासेमार नर्मदेच्या विस्तिर्ण पात्रात होडीवर मासेमारी करतांना बघणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. नर्मदेचा सहस्त्रधारा हा घाट नैसर्गिक सौंदर्याचा अमीट असा आविष्कार आहे. नर्मदेचा हट्टी प्रवाह असंख्य पाषाणांच्या सुळक्यावरुन कापला जाऊन नर्मदा अनेक धारांमध्ये विभागली जाते म्हणून सहस्त्रधारा. ह्याच घाटावर वसलेल्या वृद्धाश्रमातील वृद्धांना नर्मदेचा सहारा. ह्याच नर्मदेच्या काठावर दर १२ वर्षांनी भरणा-या कुंभ मेळ्यात सामील व्हायला अक्षरश: लाखो लोक जमतात.
मंडल्याला एक स्वर्णिम इतिहास आहे मात्र हा इतिहास मेनस्ट्रिमइतिहासाने दाबून टाकल्यासारखा वाटतो. अगदी करोडो वर्षांच्या इतिहासापासून तर अगदी आत्ताआत्ताच्या इतिहासापर्यंतची मंडला परिसराला देणगी आहे. मंडल्यापासून ४० कि.मी. अंतरावर भारतातले पहिले जीवाश्म राष्ट्रिय उद्यान आहे. ६.५ कोटी वर्षांआधीपासूनचे वनस्पती प्राण्यांचे अवशेष इथे सहजतेने सापडतात. ३० हेक्टरच्या क्षेत्रफळात पसरेले हे राष्ट्रीय उद्यान पृथ्वीच्या जिआलाजीकल इतिहासाचे दृष्य उदाहरण आहे. केळीच्या फळात पूर्वी बिया होत्या, निलगीरी हा वृक्ष भारतीय आहे वैगेरे नवीन गोष्टींचा खुलासा ह्याच जीवाश्म उद्यानामुळे झाला. ह्या उद्यानात फेरफटका मारतांना करोडो वर्षांच्या जीवनाचे अवशेष ठाई ठाई विखुरलेले दिसतात.
महाभारत काळापासून हा प्रदेश महाप्रतापी नाग वंशीयांचा प्रदेश म्हणून सुप्रसिद्ध होता. वारंवार महाभारतात आर्यांच्या व नागांच्या उडालेल्या खटक्यांची कथा येत राहते. मंडला हे नागांचं महत्त्वाचं ठाण असावं. मंडला पासून २८ कि.मी. वर नर्मदा आणि तीची एक छोटी उपनदी बुढणेरच्या संगमावर देवगांव नावाचं गाव आहे. शिध्रकोपी जमदग्नी ऋषींच्या आश्रमाचं ते गाव. प्राचीन ग्रंथात मंडला शहराचे नाव महिष्मती नगरी असे होते. महिष्मतीचा राजा सहस्त्रबाहू ह्याने परशुरामच्या वडिलांना म्हणजे जमदग्नीला मारुन त्याच्या गाई पळवल्या त्यावरुन परशुरामाने सहस्त्रबाहूचा समग्र वंश उच्छेद करुन प्रतिषोध घेतला. देवगाव मध्ये एका गुफेमधल्या मंदीरात आकर्षक शिवलिंग आहे. त्याच ठिकाणावरुन पुर्वेला १३ किलो मिटरवर वसलेल्या एका पहाडावर परशुरामाचा आश्रम आहे. तिथेच सिंगारपूर हे ठिकाण; राजा दशरथाच्या पुत्र कामेष्ठी यज्ञानंतर शृंग ऋषी या ठिकाणी येऊन राहिले अशी आख्यायिका आहे. कबिराने जेथे तपस्या केली ते ठिकाण, कबीर चबुतरा, सुद्धा मंडल्यापासून अगदी जवळ आहे. याच ठिकाणी सिख्ख गुरु नानक आणि कबिरची भेट झाली होती. मंडला शहरात असलेल्या कबीर पंथीय लोकांसाठी हे ठिकान म्हणजे काशी आहे. नर्मदेचे उगमस्थान असलेले आध्यात्मिक व नैसर्गिक सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण अमरकंटक मंडलापासून १०० कि.मी. वर वसलेले आहे.   
मंडला हे गोंड साम्राज्याचं महत्त्वाचं ठिकाण. सोळाव्या शतकाताच्या सुरुवातीपासून गोंड राजे संग्रामसाही यांनी आपल्या राज्याचा विस्तार मंडलापासून ५२ गढांपर्यंत केला. १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच त्याच्या राज्याचा विस्तार भोपाळपासून तर छोटा नागपूर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून तर चांदा (चंद्रपूर) पर्यंत केला. दुर्गावती ही संग्रामसाहीची पत्नी. संग्रामसाहीच्या तरुणपणातच झालेल्या मृत्यूनंतर राणी दुर्गावती मंडलाच्या सिंहासनावर आरुढ झाली. विद्वत्ता, ऐश्वर्य, कला व संस्कृतीचा अत्युच्च संगम हिच्या काळात झाला असे म्हणतात. त्या काळी अकबराने राणी दुर्गावतीच्या राज्यकारभाराचा अभ्यास करण्यासाठी एक दुत मंडल्याला पाठवला होता. मंडल्यामध्ये नर्मदा आणि बंजर नदीच्या संगमावर वसलेला गोंडांचा ऐतिहासिक किल्ला गोंड साम्राज्याच्या उत्कर्ष आणि पतनाचा मूक साक्षीदार आहे. किल्ला तिन्ही बाजूने नर्मदेने वेढलेला असून चौथ्या बाजूने दोन मोठमोठे खंदक निर्माण केले आहेत. किल्याच्या आत राजराजेश्वरीचे मंदीर संग्रामसाहीने बनवले होते. तथापि राणी दुर्गावती नंतर गोंडांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि एका स्वर्णीम युगाचा अंत झाला. त्या स्वर्णयुगाचे भग्न अवशेषच फक्त शिल्लक आहेत.
नैसर्गिक दृष्टीने मंडल्यावर निसर्गाने बरीच कृपादृष्टी केलेली आहे. कान्हा हा जगप्रसिद्ध व्याध्र प्रकल्प मंडल्यापासून १०० कि.मी. अंतरावर आहे. संपूर्ण शहरात गर्द झाडी आहे, उद्यानं आहेत, पुतळे आहेत आणि जिल्ह्याचे ठिकाण असूनही फारसी धावपळ नाही. मंडल्याच्या रस्त्यावरुन अनेक युगं एकाच वेळी हातात हात घालून मार्गक्रमण करतांना वाटचाल करतांना दिसतात. आजूबाजूच्या गोंड टोल्यावरुन मंडल्याच्या बाजारात अनवाणी पायाने लाकडाच्या मोळ्या, कोळसे, बांबूच्या गवताच्या विविधांगी वस्तू, जंगलातली वनोपजं विकण्यासाठी आणनारी गोंड मंडळी मनाला एका वेगळ्याच प्रदेशात घेऊन जातात. अजूनही आपली समाज व्यवस्था ही जैवभार आधारित समाजव्यवस्थाच आहे हे मनाला पटते. विविधता ही मंडल्याच्या एकुणच जीवनाचा सुर आहे, बाजारात असंख्य प्रकारचे मासे, भाज्या, कंद, मातीची विविध आकाराची भांडी, विविध प्रकारचे गुण्यागोविंदाने नांदणारे लोक हे आदिवासी विभागाचं विशेष इथे बघायला मिळते. नर्मदेबद्दलची समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये असणारी आस्था, श्रद्धा निसर्गाला आपण कोणत्या दृष्टीकोनातून बघतो याची प्रचिती देते. देशाच्या अन्य भागांमध्ये जेव्हा नद्या मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या आहेत तेव्हा मंडल्याची नर्मदा अजूनही यौवनावस्थेतच वाटते.  
नागपूरकडे जाणारी बस नर्मदेच्या एक किलोमीटर लांब पुलावर पोहोचते आपोआप प्रवाशांचे हात जोडल्या जातात. खाली घाटावर,
सहस्त्र शिरसं विन्ध्यं नाना द्रुम लता वृतम,
नर्मदां च नदीं दुर्गां महोरगनिषेविताम
चे स्वर दरवळत राहतात.


Saturday, March 14, 2015

माझी चित्तरकथा

डा. निलेश हेडा
दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात कधी म्हणजे कधीच जमल्या नाहीत, एक म्हणजे नृत्यकला आणि दुसरं म्हणजे चित्रकला. ह्या दोन महान कलांच्या बाबतीत घोर न्युनगंड घेऊनच या नश्वर जगात आम्ही आलो आहोत. त्यामूळे लग्नाच्या मिरवणूकीत नाचणारे जीव बघितले की कितीही घाईत आम्ही असलो तरी दोन क्षण का होईना थबकून डोळे भरुन पाहतो जरुर. एक तर आमची शारीरिक उंची ही सहा फुटाच्याही पार गेलेली असल्याने नाचतांना आम्ही कसे दिसू याचा साधासा विचारही आम्हाला प्रचंड दडपण आणतो. “नाचता येईना अंगण वाकडे” अशा सारख्या म्हणींचा आमच्यावर सुतरामही प्रभाव पडत नाही कारण अंगण सरळ असो की वाकडे आमच्यासाठी सारखेच!
चित्रकलेच्या बाबतीत भारताचा झेंडा काय तो (तो ही फडकत नसलेला!) आम्ही निष्णातपणे काढू शकतो, त्यातही मधलं अशोक चक्र काढण्यासाठी एक रुपयाचा कलदार लागतोच! तरी सुद्धा ह्या वेळी एका वर्कशाप मध्ये जेवनानंतर, प्रचंड बोर होत असतांना, एक अबस्ट्रॅक्ट की काय तरी प्रकारात मोडणारं चित्र काढून आम्ही हौस भागऊनच घेतली. (वर्कशाप मध्ये बोर व्हायचं कारण सुद्धा होतं म्हणा. म्हणे, "स्केलिंगअप का अर्थ है होरिझंटल और व्हर्टीकल दिशामें आबजेक्टिव का बढना”. किंवा म्हणे, “समाज मनात जोवर आपण लॉगइन करत नाही तोवर सामाजिक परिवर्तनाला दिशा मिळत नाही”. बापरे! मानसासारखं बोला की रे बाबांनो!).
तर या वर्कशाप मध्ये आम्ही रेखाटलेलं खालील चित्र हे जीवनातल्या विविधतेला अन कॉम्प्लेक्सिटीला लांबी, रुंदी अन खोलीचं भरजरी परिमाण प्राप्त करुन देणारं आधूनिक चित्रकलेचं दालन अनेक अंगानी समृद्ध करणारा प्रयत्न आहे. ह्या आमच्या चित्राने चित्रकलेच्या फ्रांज गोथे पासून तर हुसैन पर्यंतच्या प्रयत्नांना एक आडवा उभा अन तिरपा छेद दिला आहे! (काय पण मस्त मार्केटींग व्वा व्वा! एनजीओ क्षेत्रात जर काही काळ आम्ही अधिक टिकलो (तशी शक्यता कमीच वाटते म्हणा!) तर टकल्या मानसाला सुद्धा कंगवा विकण्याची कला अवगत करुन घेऊ यात शंका नाही!).
खालील चित्र हे कोणत्याही फॉर्म मध्ये (उदा. इलेक्ट्रानिक, लिक्विड, सॉलिड इत्यादी) आपण वापरु शकता. चित्रकाराच्या नावाचा उल्लेख केला नाही तरी चालेल. शेवटी आम्ही कॉपी राईट वाले नसून कॉपी लेफ्ट वाले “लेफ्टिस्ट” आहोत!)



लय भारी कविता

डा. निलेश हेडा

खालील आम्ही स्वत: लिहलेल्या ३+१ अशा चार नवकविता ह्या साहित्य विश्वात तळतळ (!) करत तळपणा-या क्रांतीचा आणि प्रेमाच्या हळुवार भावनांच्या “गर्जा जयजयकार” आहेत. यातल्या सुरुवातीच्या ३ कविता ह्या सामाजीक आशयघणता अचूकपणे शब्दांच्या चिमटीत पकडणा-या मानवी आषाआकांक्षांचा “लाल सलाम” असून चौथी कविता ही प्रेम कविता (इश्श!) असून आमच्यातल्या हळूवार प्रेम भावनांना हळूच वाट मोकळी करण्याचा प्रयत्न आहेत, ती शेवटची कविता वाचकांनी हळूच वाचावी, माझी इटूकली पिटूकली छोनीली “कविती” दुखवायला नक्को गडे! सुरुवातीच्या तिन कवितांचा दोस्तोवस्की, लिओ टॉलस्टाय इत्यादींच्या विचारधारेशी कोणाला काही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा (काही समीक्षक त्याचा पहिल्या धारेशी संबंध स्थापीत करण्याचा खोडसाळ प्रयत्न करतील ही बाब अलाहिदा!). ह्या चार कविता म्हणजे नवकविंचे तोंड (की लेखणी!) बंद करण्याचा प्रयत्न आहे असा समज केल्या जाऊ शकतो पण आमची स्पर्धा ही केवळ आणि केवळ पॉल ब्रॅडले, जेम्स क्रेनफर्ड सारख्या जीवनाचं खरं मर्म जाणलेल्या कविंशीच आहे. ज्या प्रमाणे काही दिवसांआधी एक नवचित्र काढून जीवनाला आम्ही आडवे उभे छेद दिले होते (आडवे उभे छेद ही कल्पना आम्हाला “विहरीत आडवे उभे बोअर करुन मिळेल” या जाहिरातीतून सुचली आहे!) त्याच धर्तीवर ह्या कविता सुद्धा साहित्य विश्वाला आडवे उभे छेद देणा-या आहेत.
खालील चारही कविता एखाद्या विद्यापीठात लावण्याच्या प्रयत्नात आम्ही असून आमच्याच शिष्यमंडळातील दोघांना एम.फिल. तर एकाला पीएचडी साठी आम्ही तयार करतो आहोत. ह्या नवकविता दुर्बोध (अन जराश्याक विक्षीप्त!) वाटू शकतात पण समग्र कार्ल मार्क्स, फेड्रीक एंजेल, ज्ञानेश्वरीचे मधले तिन अध्याय अन समग्र डोस्टोवस्की समजून घेतल्यास ह्या कवितांचं आकलन सोप होइल. तेही न जमल्यास खालील कविता सायंकाळी वृद्ध साधू (Old monk), सोबत नुसत्याच वाचाव्यात/गरम गरम परोसे, चांगल्या लागतात असा अनूभव आहे! वृद्ध साधूच्या सानिद्यात भल्याभल्यांचा हेराक्लिटस अन प्लेटो बनतांना बघीतलय आम्ही! तो फिर इरशाद फरमाइये.
*********************************************************************************************************
कविता क्र. १: डायलेम्मा फ मेंडेल
विखरुन पडलेत बिना शाईचे पेन
माझ्या युद्धाळलेल्या
अभ्यासीकेच्या शयन रथांवर.
गिरणीचा भोंगा वाजेल
अन आगगाड्यातून झडेल जेव्हां
विषारी आग तेव्हा
हे मेंडेला (मंडेला नव्हे!)
तुझ्या वाटाण्यांच्या बियांचं
काय होईल रे बाळा?
*********************************************************************************************************
कविता क्रमांक दोन. डायलेम्मा आफ कार्ल मार्क्स
विविक्षीत, प्रक्षीप्त, प्रबूद्ध
अशा रशीयाच्या लाल चौकातून
माझा नागपूरी खर्रा
घोटला जातोय,
आजच हा नांगर
का मोडून पडला गडे?
आता कसं पेरावं हे सोयाबीनच बियाणं?
*********************************************************************************************************
कविता तिसरी. डायलेम्मा आफ खानापीना
बनवलेत आज मी
एकादशीचे मोदक
तोंडले भाताचा नैवेद्य
आज गुरुवारी हवेत मला
तुझ्या क्रांतीचे मउशार बर्गर.
*********************************************************************************************************

कविता चौथी (प्रेम कविता. इश्श!) डायलेम्मा आफ शेले
तुझ्या आठवणींची
फाटकी छत्री कुठे ठेवलीस तू?
नुसता चिखल झालाय भावनांचा.
“वर्षत सकळ मंगळी,
तुझ्या गोड आठवणींची झारी.”
*********************************************************************************************************


  

गेल्या तिन दशकांमध्ये व-हाडात नेमकं काय घडलं?
डॉ. निलेश हेडा
गेल्या तिस वर्षात व-हाडात नेमकं काय घडलं? तिस वर्षातले बदल अगदी संक्षेपात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. व-हाड शेतक-यांच्या आत्महत्येकरीता कुप्रसिद्ध आहे. शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच परिस्थितीकी शास्त्रिय (Ecological) गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच एक कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न. माझा जन्म हा आसोला ह्या छोट्याश्या गावात झाला. गेल्या तिस वर्षात एखाद्या चित्रपटाप्रमाणे ग्रामिण परिदृष्य बदलतांना बघतोय. त्या चित्रपटाचा हा संक्षिप्त आढावा. या लेखाचा उद्देश्य कोणतेही समाधान सुचवणे नसून केवळ बदलाचा आढावा घेणे मात्र आहे.   
************************************************************************************************
दोन दशकांआधी व-हाडात सोयाबीन आलं. ज्वारी हळुहळू बाद होत गेली. ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गोधन कमी झालं. २०० बैलांचा पोळा ५० बैलांवर आला. अनेक गावांमधून चक्क पोळ्याचा सनच हद्दपार झाला. “खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायराणांचं महत्व कमी झालं. गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड” असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं. गायरानांवर अतिक्रमन झालं. सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला. सोयाबीनचा उल्लेख कोणत्याही स्थानिक पारंपरिक औषधी प्रिपरेशनमध्ये आढळत नाही. सोयाबीनशी कोणतेही सांस्कृतीक संदर्भ जुळलेले आढळुन येत नाहीत. पुर्वीच्या काळी घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं ज्वारीच्या “कण्या” खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला. सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या. त्यातच डि.ए.पी. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली. सेंद्रिय कर्ब (organic carbon) हा जमीनीतला अत्यंत महत्वाचा घटक. तो जर कमी होत जात असेल तर माती मृत होत जाते. व-हाडात अनेक ठिकाणी तो चक्क ०.२ टक्क्यांपर्यंत घसरला. एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे दुसरीकडे त्यात शेनखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण करुन ठेवण्याची क्षमता आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली. जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून भूजल संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन सारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या. अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं धान्य कमी भावात ग्रामीन भागात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली. त्यातुन लाचारीचा जन्म झाला. लाचारीतुन आत्मसन्मान गेला. आत्मविश्वास गेला. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं. शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवकांना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला. गावागावात अमूक सेना तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले.  इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुन वाहायला लागला. डोळ्यादेखत ३०-३२ वर्षांची किती पोरं दारु पिऊन पटापट गेली? इलेक्शन आलं, छटाक भर आकाराच्या गावात घड्याळीवाले, कमळवाले, इंजनवाले, पंजावाल्यांच्या दुकानदा-या सुरु झाल्या. गाव विभागलं, दुभंगल. यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे सबसीडीसाठी चकरा मारणा-या लाचार शेतक-याची संख्या वाढायला लागली.
दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले; त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला. सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं. शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं. त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली. नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला. जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली. तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन व-हाडात आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
गावातले सुतार, लोहार, कुंभार सगळे कुठे गेले? माझ्या वाशिम जिल्ह्यातल्या आसोला गावचा जयराम सुतार परफेक्ट सुतार होता. स्वभावाने मात्र फार गरम. जरासाक तिरसट. शेतात तिफनाची दाती तुटली तर अख्खा तिफन त्याच्याकडे घेऊन जायची गरज नव्हती. तुटलेली दाती नेली की गावातल्या कोणत्याही तिफनाचं माप घेऊन तासून परफेक्ट मापाची दाती बनऊन द्यायचा. शेतात गेलं की त्यानं तासून दिलेली दाती तंतोतंत बसलीच पाहिजे कारण गावातल्या सगळ्या तिफनाच्या दातीच्या छिद्राचं माप तो एकच ठेवायचा. सगळ्या गावाची सुतारकी त्याच्याकडे असल्याने दिवसभर "बिझी" राहुन सुद्धा आम्हा लहान मुलांसाठी खेळण्याच्या बैल बंड्या बनऊन द्यायचा. गावात पहिला ट्रॅक्टर अन लोखंडी नांगर आल्यावर मात्र तो जास्त काळ जगला नाही. आता आपलं गावाला फार काम नाही असं तर वाटलं नाही त्याला?
तसाच एक उद्धव सुद्धा होता. उद्धव परफेक्ट तिफन हानायचा. त्याची काकरं सरळ लाइनात यायची कंपासच्या स्केल ने जमीनीवर सरळ रेषा ओढावी तशी. दोन काकरातलं अंतर एक सारखं पॅरेलल नसलं की डव-याचा फेर देतांना डवरा निट चालत नाही. उद्धवच्या दोन्ही काकराच्या रेषा परफेक्टली पॅरलल असायच्या. गावाकडे गेलो की त्याला मी पायथॅगोरस नावाने हाक मारायचो. तिफनाच्या मागे सरतं चालतं. त्यातल्या नारवाट्यातुन बाया बियानं टाकतात. तिफन बरोबर चालवला नाही की बियानं जमीनीत विशिष्ठ खोलीवर पडत नाही. बरोबर उगवत नाही. सरताच्या मागे फसाट चालते. फसाट जमीनीच्या पोटात पडलेल्या बियानावर माती झाकते. माती व्यवस्थितच झाकल्या जायला हवी नाही तर पुन्हा बियाणं व्यवस्थित उगवत नाही. त्यामुळे तिफन व्यवस्थित चालत जाणे गरजेचे. म्हणूनच मृगाच्या धारा आल्या की उद्धव गावातला एक्सपर्ट बनायचा. त्याची अपाइंटमेंट घ्यावी लागायची. त्याच्या हातुन पेरणी झाली की सर्वजण निश्चिंत व्हायचे. कमी जास्त पाऊस झाला तरी बियानं हमखास उगवायचं. उद्धवचा मुलगा अहमदाबाद मध्ये बंगल्यांची रंगरंगोटी करायला गेला. बापासारख्याच भिंतीवर ब्रश ने सरळ रेषा काढायचा तो. दोन ब्रशच्या फटका-यांच्या रेषा परफेक्टली पॅरलल असायच्या. दर दिवाळीला तो उद्धवसाठी कपडे पाठवायचा. गेल्या वर्षी उद्धव गेला. त्यानंतर त्याचा पोरगा अहमदाबादवरुन कधीच परतला नाही!
भोई ही व-हाडातली मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करणारी जनजात. व-हाडाच्या शुष्क प्रदेशात वर्षातला संपूर्ण काळ मासेमारीवर अवलंबून राहणे शक्य नसते त्यामुळे ह्या जमातीने मासेमारी सोबत काही पुरक व्यवसाय सुरु केले होते. त्या व्यवसायांमध्ये पालखी वाहने, नावेच्या सहाय्याने लोकांना या काठावरुन त्या काठावर नेणे (रामाला नदी पार करविणारा केवट हा मासेमार जमातीतलाच!) आणि हरभ-यापासून फुटाने तयार करण्याचा समावेश होता. दळणवळणाच्या सोयींमुळे पालखीची प्रथा निकालात निघाली, नदीवरच्या पुलांमुळे नावा संपल्या. फास्ट फुडच्या प्रचारामुळे फुटाने कालबाह्य होत आहेत आणि अनेक कारणांमुळे मासे संपले. जुणे पारंपरिक व्यवसाय नष्ट होणे, नवीन व्यवसाय दृष्टीच्या टप्यात न येणे, छोटे समूह असल्याने राजकीय दबाव न निर्माण करु शकणे अशा अनेक दृष्टचक्रात हे व-हाडातले लोक अडकत गेले.
त्यातच मग सिंचन प्रकल्प आले. नेत्यांच्या, अभियंत्यांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. 372 कोटी रुपयांच्या बजेटचं गोसे खुर्द धरण ३२ वर्षांच्या कालावधीत १८४९५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं यातचं विदर्भातल्या सिंचनाचं गौडबंगाल लक्षात यावं. असो, बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली. त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून ज्ञानाची पारंपरिक तिजोरी रिती व्हायला लागली. अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला. या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, “शेतमालाचे भाव वधारणे”. हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा. शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग बोंब ठोकणार. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही. उत्पादन खर्च आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला. यातुन मग सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली. शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या. आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.
आता उरला महत्वाचा आधार तो म्हणजे भागवत सप्ताहांचा, मंदीरांचा, आधुनिक भटांच्या धार्मिक दुकानांचा. गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. गणपती, दुर्गा देवी मंडळांची चलती आली. एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला. सरकारही शेतक-यांनी आत्महत्या करु नये म्हणून कोटी कोटी रुपयांचे बजेट असलेले, जगण्याची कला (आर्ट आफ लिविंग) शिकवणा-या बाबांना आयात करती झाली. बाबा आले अन गेले पण आत्महत्या होतच गेल्या. आत्महत्या होतच आहेत.

Tuesday, January 13, 2015

गेल्या तिन दशकांमध्ये व-हाडात नेमके काय घडलं?

गेल्या तिन दशकांमध्ये व-हाडात नेमके काय घडलं?
डॉ. निलेश हेडा

गेल्या तिस वर्षात व-हाडात नेमकं काय घडलं? तिस वर्षातले बदल दोन पानात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच इकालाजीकल गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच एक कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.
************************************************************************************************
दोन दशकांआधी व-हाडात सोयाबीन आलं. ज्वारी हळुहळू बाद होत गेली. ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला. कडब्याचा चारा नसल्याने गोधन कमी झालं. २०० बैलांचा पोळा ५० बैलांवर आला. “खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं. गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड” असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं. गायरानांवर अतिक्रमन झालं. सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला. घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं. एक आधार असायचा. बिकट परिस्थितीत लोकं ज्वारीच्या “कण्या” खाऊन जगली. ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला. सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या. त्यातच डि.ए.पी. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली. एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे दुसरीकडे त्यात शेनखताची कमतरता यामुळे जमीनीची पाणी धारण क्षमता आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली. जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून भूजल संपुष्टात यायला लागलं. (सोयाबीन सारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली. एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं. एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या. अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं धान्य कमी भावात ग्रामीन भागात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली. त्यातुन लाचारीचा जन्म झाला. लाचारीतुन आत्मसन्मान गेला. आत्मविश्वास गेला. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं. शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला. गावागावात अमूक सेना तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले.  इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुन वाहायला लागला. डोळ्यादेखत ३०-३२ वर्षांची किती पोरं दारु पिऊन पटापट गेली? इलेक्शन आलं, छटाक भर आकाराच्या गावात घड्याळीवाले, कमळवाले, इंजनवाले, पंजावाल्यांच्या दुकानदारी सुरु झाल्या. गाव विभागलं, दुभंगल. यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे सबसीडीसाठी चकरा मारणा-या लाचार शेतक-याची संख्या वाढायला लागली. दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले; त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला. सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं. शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं. त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली. नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले. त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला. जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं. नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली. तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन व-हाडात आल्या. यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला. त्यातच मग सिंचन प्रकल्प आले. नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या. बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली. त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून ज्ञानाची पारंपरिक तिजोरी रिती व्हायला लागली. अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले. याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला. या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, “शेतमालाचे भाव वधारणे”. हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा. शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग बोंब ठोकणार. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही. उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले. परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली. शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या. आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले. आता उरला महत्वाचा आधार तो म्हणजे भागवत सप्ताहांचा, मंदीरांचा, आधुनिक भटांच्या धार्मिक दुकानांचा. गावागावात ५०-५० हजाराचं बजेट ठेऊन आयोजीत केल्या जाणा-या भागवत सप्ताहांचं अक्षरश: पीक आलं. गणपती, दुर्गा देवी मंडळांची चलती आली. एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला. सरकारही शेतक-यांनी आत्महत्या करु नये म्हणून कोटी कोटी रुपयांचे बजेट असलेले, जगण्याची कला (आर्ट आफ लिविंग) शिकवणा-या बाबांना आयात करती झाली. बाबा आले अन गेले पण आत्महत्या होतच गेल्या. आत्महत्या होतच आहेत.
निलेश हेडा