Friday, November 24, 2017

संस्मरण - राजस्थान


बदलाचं वारं वाहतय 


डा. निलेश हेडा

या वेळी राजस्थानच्या ग्रामिण जीवनाला जवळून बघता आलं. तशीच बकाली, भंणगलेपणा. गरीबी. अभाव. भारतीय गावं स्वत:सोबत अनेकानेक शाप घेऊन जन्माला आलेली वाटतात. पण स्थानिक संस्कृती त्या अभावावर, गरीबीवर चंदनाच्या लेपाचं काम करते, हे राजस्थानच्या ग्रामिण जीवनात मिसळून कळते. या वर्षी पुन्हा उत्तर राजस्थान मध्ये पाऊस नाही. विदर्भासारखीच परिस्थिती आहे. वातावरणातील बदलाचा मोठाच फटका ग्रामिण भारताला बसतोय. येणा-या काळात मोठीच उलथापालथ होणार असं दिसतं. पाणवठ्यांच्या कलेकलेने विकसीत झालेला हा समाज आहे ज्याला सुका आणि ओला दुष्काळ वाईट दिवस दाखवणार आहे. त्याच वेळी पाण्याबद्दल, निसर्गाबद्दल समज नसलेला आणि केवळ "वेग - सिमेंट - लोखंड - प्लास्टीक" यांनीच विकास होतो असं माननारा त्यांचा वर्तमान शाषक वर्ग हे आमच्या काळचं मोठच दुरदैव आहे.
पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत आपल्या पुर्वजांच्या पासंगातही आपण बसत नाही. जैसलमेर मध्ये गडीससार तलाव आहे. 1367 मध्ये रावल गडसी सिंघ या राजाने याचं निर्माण केलं. त्यावेळी जैसलमेरची लोकसंख्या ५००० होती. तसेच दररोज २००० उंटावर लादून विविध प्रकारचा माल घेऊन व्यापारी जैसलमेर वरुन आखाती देशात जायचे. या सर्वांना हा तलाव जीवन द्यायचा. या तलावाच्या काठावर एक पुर्णाकृती हत्ती चा दगडी पुतळा आहे. पावसाळ्यात हत्तीचे पाय पाण्यात बुडाले की शहरात दवंडी दिल्या जायची की आता एक वर्ष जैसलमेरला पाण्याची चिंता नाही. हत्ती पाण्यात बुडाला की तिन वर्ष चिंता नाही. हत्तीच्यावर घोड्याची प्रतिमा आहे. घोडा बुडाला की ५ वर्ष चिंता नाही. पाण्याच्या नियोजनाबद्दल खरचं काही गांभिर्यानं शिकायच असेल तर राजस्थान हा आपला गुरु आहे. 
या वेळची "नदी खोरे व्यवस्थापनाची" बॅच फार वेगळी होती. जी. बी. पंत इन्स्टिट्युट आफ टेक्नालाजीच्या बांधकाम अभियंत्यांच्या विद्यार्थ्यांना नदीचं परिस्थितीकी तंत्र समजून सांगायचं होतं. आजकालचे विद्यार्थी अतिषय चौकस आहेत. चांगलीच तयारी करुन मैदानात उतरावं लागतं.
शेवटच्या दिवशी अलवर जिल्ह्यातल्या भानगढ़ या प्राचिन उजाड शहराला भेट दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत याचा कारभार चालतो. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आमेरचे शासक राजा भगवंत दास याने या शहराची निर्मिती केली. राजा मानसिंहाचे बंधू माधोसिंह जे मुगलांचे प्रमूख सरदार होते त्यांनी या शहराला आपली राजधानी बनवलं. प्रत्येकाने एकदा तरी बघावं असं हे शहर. आखीव उजाड झालेल्या बाजारपेठा, सुंदर मंदीरं, व्यवस्थित प्लान केलेली घरं आपल्या पुर्वजांच्या सिटी प्लानिंगच्या सेंसचं उत्तम उदाहरण आहे. उपयोगीतेला सौंदर्याची किणार द्यायची अन्यथा कोणतीच निर्मिती करु नये हा अलिखीत नियम तेव्हा असावा. भारतातली सर्वात शापीत, भितीदायक जागा (The Most "Haunted" Place In India) असा याचा दुष्प्रचार केल्या गेल्यामुळे आता पर्यटकांची संख्या बरीच वाढलेली आहे ! मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भानगढ मधल्या सर्व आत्मा सुट्टीवर गेल्या होत्या! 
उत्तर राजस्थान मध्ये आजकाल प्रवासी गाड्यांमध्ये, पानटप-यांवर हरीयानवी भाषेतली पॉप रॉक या पाश्चात्य संगितात मिसळून बनवलेली शृंगार गिते प्रचंड लोकप्रिय होत आहेत. अगदी साधे साधे ग्रामिण शृंगारीक शब्द अन स्थानिक चाली मध्ये तयार केल्या जाणारी ही गाणी (उदा. तू रुप की भरी तिजोरी है, कोई परदेसी मारा जावेगा!) तालुका जिल्हा स्तरावरील युवक यु ट्यूब चॅनेल काढून त्यावर प्रकाशीत करत आहेत. हा वेगळ्याच प्रकारचा सांस्कृतीक बदल आहे. आपण युरोपीयन होतोय. भरपूर गाणी ऐकली ही. मजा आली. 
निलेश (सप्टेंबर २०१७)

संस्मरण - राजस्थान

नद्या वाचल्या तर सभ्यता तग धरुन राहील

डा. निलेश हेडा

यावेळी राजस्थानमध्ये नदी अभ्यासक्रमाची बॅच फार वेगळी होती. सॉफ्ट वेअर इंजीनीयर, आर्किटेक्ट, सि.ए. पी.एचडी चे विद्यार्थी इत्यादी बरेच जन होते. अशा विषयात प्राविण्य मिळवून सुद्धा निसर्गाबद्दल जाणून घ्यायची यांची इच्छा अचंबीत करणारी होती. सर्वांचा परिचय घेतांना त्यांच्या विभागात पावसाची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत होतो. भारतभर ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचं सावट आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम आता स्थानिक स्तरावर दिसायला लागले आहेत. आपण मात्र शहामृग होऊन बसलोय. इथे अरावलीच्या पायथ्याशी बसून आम्ही पाण्याबद्दल चिंता करतोय आणि जवळच जयपुर मध्ये “मद्मावती” साठी हजारोने युवक आंदोलन करत आहेत. इतिहासाने युवकांचा मेंदू फारच वाईट पद्धतीने काबीज केलाय? निसर्गासाठी आंदोलनाचे दिवस सरलेत भारतात. आता पुन्हा "चिपको" "नर्मदा बचाओ" सारखी आंदोलनं घडेल की नाही माहित नाही. 
दुस-या दिवशी पंधरा सोळा विविध देशातुन आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांसोबत गप्पा मारता आल्या. युरोपातील लोक नद्यांबद्दल प्रचंड संवेदनशील आहेत. कोणे एके काळी मात्र तिथल्या नद्यांची परिस्थिती आपल्या पेक्षाही वाईट होती. सध्या आपण मात्र भारतीय नद्यांच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील झालोय. नदीला माता बिता मानून आपण एक नंबरचे पाखंडी आहोत हेच सिद्ध करतोय. लंडन शहरातुन थेम्स वाहते. ३ सप्टेबर १८७८ रोजी थेम्स नदीत सुप्रसिद्ध लंडन ब्रिज जवळ The Princess Alice नावाचं जहाज बुडालं. त्यात ६५० लोक बुडून मरन पावले. त्यातल्या बहुतांश लोकांना पोहायला यायचं मात्र तरीही ते का बुडाले? त्याचं कारण हे होत की, त्या काळी थेम्स इतकी जास्त प्रदुषीत झाली होती की पाण्यातल्या विषारी वायूनेच लोकांचा अंत झाला (त्या काळी दररोज ७५ दसलक्ष इंपेरीयल गॅलन इतकं सांडपाणी थेम्स मध्ये सोडल्या जायचं. १ इंपेरीयल गॅलन =३.७८ लिटर). मात्र आजची थेम्स अतीषय निर्मळ अशी नदी आहे (मी स्वत: २०१२ मध्ये लंडन मध्ये हे अनुभवलय). 
चंबल ही भारतातली अतीषय निर्मळ अशी नदी म्हणून ओळखल्या जाते. तिचं पौरानीक नाव चर्मवंती (यज्ञात आहुती देण्यासाठी रांतीदेव या राजाने हजारो गाई बैलांची कत्तल केल्याने चामडं (चर्म) आणि रक्ताचे लोट या नदीत गेले म्हणून चर्मवंती हे नाव, असा महाभारतात संदर्भ आहे. पुर्वी हा शकुनी मामाचा प्रदेश होता. द्रौपदीच्या वस्त्रहरनाच्या वेळी तिने या प्रदेशातल्या लोकांना शाप दिला की चंबलचे पाणी जर तुम्ही वापरले तर तुमचं अहीत होईल आणि याच कारणामुळे चंबल अनेक शतकांपर्यंत स्वच्छ राहीली!). कोटा वरुन आलेले एक जन चंबलचं दुख: सांगत होते की आता चंबल पुर्वी सारखी राहिली नाही. कोटा शहरातील कचरा, प्लास्टीक, वाढत चाललेली शेती आणि त्यातुन नदीत जाणारा किटकनाशकांचा प्रवाह, वाढत चाललेले कारखाने आणि त्यातुन बाहेर पडनारं पाणी, मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या खाणकामाने चंबलचा घास घ्यायला सुरु केलीय. चंबल मगरींसाठी अत्यंत उत्कृष्ट अधिवास आहे. हीच कथा कमी अधीक प्रमाणात सगळ्यात भारतीय नद्यांची आहे. नागपूरवरुन प्रणय तिजारे नावाचा एक मित्र सामील झाला होता, नाग नदीच्या बाबतीत रिवर फ्रंट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचं त्याचं म्हणनं होतं. रिवर फ्रंट (अहमदाबादच्या साबरमती सारखं!) ने नद्या वाचतील ही फार मोठी अंधश्रद्धा गुजरात मॉडेल ने आपल्याला दिलीय. 
पुण्याचे विनोद बोधनकर सुद्धा या वेळी सोबत होते. अनेक वर्षांपासून विनोदजीं सोबत माझा वार्तालाप आहे. अतीषय संवेदनशील असं हे व्यक्तीमत्व. तिन दिवस दोघही सोबतच होतो. “सागरमित्र” म्हणून ते एक विद्यार्थ्यांसोबत अभीयान चालवतात. प्लास्टीकचं नियोजन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. प्लास्टीक हे नद्यांच्या मृत्यूचं महत्वाचं कारण आहे. हे सगळं प्लास्टीक शेवटी समूद्रात जातं आणि त्याचे मायक्रोफिल्मस चक्क जैवविविधतेच्या मध्ये जाऊन शरीराचा भाग बनतात. प्लास्टीक बद्दल खुप गांभिर्यानं विचार करण्याची गरज आहे.  
परततांना राजेंद्र सिंह सोबत होते. त्यांना भोपाळला उतरायचं होतं, मी पुढे नागपुरला उतरलो. रेल्वेत उशीरा पर्यंत गप्पा करत बसलो. राजेंद्र सिहांमध्ये पॅशन, करुणा, वात्सल्य असे सगळे गुण एकसाथ नांदतात. कंपॅशन शिवाय पॅशनला काही अर्थ नसतो हे त्यांच्या कडून शिकावं. भेटल्यावर किंवा निरोप घेतांना पाठीवर इतक्या मायेने हात फिरवतात की उगाच आपल्याला गहिवरुन येतं. भेटल्यानंतर घरातल्या सगळ्यांची चौकशी करणे, आमच्या सगळ्या मित्रांची आठवण ठेउन प्रत्येकाबद्दल विचारने हे त्यांच्या कडून सहज घडते. भोपाळला येतांना त्यांच्या जवळ एक अगदीच छोटीसी बॅग होती. भोपाळवरुन ते हैदराबादला जाणार, तिथुन भुवनेश्वर, तिथुन दिल्ली, आणि दिल्लीवरुन जर्मनी. एका छोट्याश्या बॅगमधल्या मोजक्या गोष्टींनी सगळ चालणार. इतकं साधेपण पाहून स्वत:चीच लाज वाटायला लागली.