Saturday, May 17, 2014

आधूनिक करंज महात्म्य
डॉ. निलेश हेडा


कारंजा हे आटपाट नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांच्या ठिकाणापासून ६० ते ७० किलोमीटरच्या “सुरक्षीत” अंतरावर वसलेलं शहर आहे. कुठही उभं राहून ब्रम्हांडाकडे बघीतलं तर ते जसं सारखचं दिसतं (संदर्भासाठी गरजूंनी स्टीफन हाकींग वैगेरेंची भारी पुस्तक चाळावीत!), तसच कुठूनही बघा कारंजा नगरी सारखीच दिसते. उपरोक्त चारही शहरांशी कारंजा नेहमीच "रोमांस" च्या मुड मध्ये असते पण "सिरीयस अफेअर" कोणाही सोबत ठेवत नाही. आम्ही अमरावतीत शिक्षण घेतो, अकोल्यातुन औषधी घेतो, वाशिम मध्ये फक्त कार्यालयीन कामासाठी जातो आणि यवतमाळशी आमचं नातं काय आहे या बाबतीत आम्ही नेहमीच "कनफ्युजन" मध्ये असतो. शिवाजींनी आमचं शहर दोनदा लुटल्यामुळे  आणि साठ उंटांवरची कस्तुरी गा-यात टाकूण कस्तुरीची हवेली बांधल्यामुळे आम्ही नेहमीच एका वेगळ्याच तो-यात असतो. अहमदनगरची राजकूमारी चांद बिवी आमच्या कारंजाचीच, त्यामुळे आम्ही नेहमी “तहजीब” मध्ये असतो. आमच्या नगराची स्थापना करंज ऋषींनी केल्यामुळे, गुरु महाराजांचं जन्मस्थळ, जैनांची काशी, चंद्राचं भारतातलं (जगातल हो! घ्या आपल्या बा च काय जाते!) पहिलं मंदीर कारंजात असल्याकारणाने आम्ही “लरेडी” मोक्ष प्राप्त करुनच या नश्वर जगात जन्माला येतो. कारंजा नगरीतल्या एकाच घरात मोदीवादी, राहुलवादी, केजरीवाल प्रेमी, वादी, प्रतिवादी, अ-वादी गुण्यागोविंदाने नांदत असल्याने कोणताही उमेदवार भरघोस मतांनी निवडुन येण्याची प्रथा आमच्याकडे नाही (त्याचा परिणाम नश्वर जगातील रस्ते, पाण्याच्या सोई, कच-याची योग्य विल्हेवाट अशा मूलभूत सोई इत्यादी गोष्टींवर होतो ही बाब अलाहीदा!). अशा ह्या छोट्याशा करंज महात्म्याच्या “झलक” ने वाचकांची कारंजा नगरीला भेट देण्याची इच्छा जागृत झाली तर ह्या आलरेडी मोक्षप्राप्त लेखकाला मोक्षातही बाल्कनीची सिट मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
बिबिसाब पु-यातील अहमदनगरची राजकन्या
चांदबिबिची मजार 
ज्ञानेश्वर महाराजांनी “नगरेची रचावी, जलाषये निर्मावी, महावने लावावी नानाविधे” ही ज्ञानेश्वरी मधली ओवी कारंजा शहराला भेट देऊनच लिहली असावी असा आमचा प्रगाढ दावा आहे. तिन विषाल जलाषयांच्या मध्ये वसलेलं कारंजा हे “टाऊन प्लानिंगचं” उत्तम  उदाहरण आहे. करंज ऋषींना झालेला असाध्य आजार दूर व्हावा म्हणून त्यांनी तप केले आणि त्यातुन ऋषी तलावाची निर्मिती झाली. या वर्षी ऋषी तलावामध्ये पुन्हा कमळ फुलल्याने देशातही कमळ फुलेल असा राजकीय विष्लेशकांच्या निष्कर्षाने कारंजाचे भारतीय राजकारणात महत्व अधोरेखीत होते. दुसरा तलाव चंद्र तलाव ह्याची कथा मोठी इंट्रेस्टींग आहे. चंद्राने (तोच आपला आकाषातला बरं!) म्हणे त्याचे गुरु बृहस्पतीच्या पत्नीशी व्यभीचार केला (मानवी स्वभाव पुरातन काळापासून असाच आहे!), परिणामत: बृहस्पतीने चंद्राला शाप दिला. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रेश्वर महाराजांनी तप केले अन चंद्र तलाव निर्माण झाला. तथापी सांप्रत काळात त्या तलावात शहरातलं सर्व सांडपाणी टाकूण आम्ही कारंजेकर “स्थितप्रज्ञ” आहोत हे जगाला दाखऊन देत असतो. तिसरा तलाव, सारंग तलाव, याला मात्र कोणताही ऐतिहासीक किंवा पौराणीक संदर्भ नाही. कारंजा शहर ही नद्यांच्या उगमाची जननी असून इथून बेंबळा, कापसी, उमा आणि साखळी नामक नद्या उगम पावतात हे (आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन!) अस्मादिकांनीच कुठेतरी लिहुन ठेवल्याचा संदर्भ गरजूंनी अवश्य शोधून काढावा. कारंजा शहराबद्दल सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे शहर दोन महासागरांना (अरबी समूद्र अन बंगाल चा उपसागर) जोडणारं शहर आहे कारण तापी आणि गोदावरी खो-याच्या रिजवर हे वसलेले आहे. म्हणजे असं बघा, लेखकाच्या घरावर पडणारं पावसाचं पाणी बेंबळा नदी मार्गे, व्हाया वर्धा  नदी गोदावरीतून बंगालच्या उपसागरात जाते तर आमच्या घराच्या मागे ५०० मीटरवर (स्थानिकांना संदर्भ लागावा म्हणून रिलायंस पेट्रोल पंप जवळ!) पडणारं पाणी हे उमा नदी व्हाया पुर्णा, तापी असा प्रवास करत अरबी सागरात विलीन होते. ज्या वाचकांना आमच्या या विधानावर विश्वास नाही त्यांना आम्ही नकाशासह पटऊन देऊ आणि चुक निघाल्यास गांधी चौक, जयस्तंभ चौक, इंदिरा गांधी चौक, आंबेडकर चौक अशा कोणत्याही सार्वजनीक ठिकाणी माफी मागण्यास तयार आहोत.
ऋषी तलावाचे विहंगम दृष्य
कारंजा हे पारंपरिक विहरींसाठी सुप्रसिद्ध शहर आहे. गणीकांची विहिर, चोरांची विहीर, सोण्याचे भांडे देणारी विहीर (आमच्या कडे घरी काही मंगल किंवा अमंगल प्रसंग असला की एका चिठ्ठीवर लागणा-या भांड्याची लिस्ट (ताट, वाट्या इत्यादी इत्यादी) लिहुन ती या विहरीत आम्ही टाकायचो अन सकाळी जाऊन तरंगत असलेली सोण्याची भांडी घरी आणायचो. पण एका व्यक्तिने लोभापाई भांडी परत न केल्याने ती सर्विस वर्तमान काळात बंद करण्यात आली आहे. जर कुणाला ट्राय करायचं असेल तर तो त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न!)
कारंजाचे ख-या चिंतेचा, चिंतनाचा आणि अस्मितेचा एकच विषय आहे आणि तो म्हणजे कारंजाच्या मुघल कालीन वेशी. ह्या वेशींच्या खालून जातांना आजही आम्हाला रणांगणात लढायला निघालेल्या सैनिकांसारखं वाटतं. स्थानिक वर्तमान पत्रांना कधीही बातम्या कमी पडो, ठेवणीतली वेशींच्या दुरावस्थेची बातमी काढून ती छापने हे वर्तमान पत्राच्या शोधापासून अविरतपणे सुरु आहे. डायरेक्ट दिल्लीशि आमचे संबंध सांगणारी दिल्ली वेश, दारव्हा वेश, पोहा वेश, मंगरुळ वेश ह्या चारही वेशी कारंजेकरांचा विक पाइंट आहे.
गुरुमंदीर प्रवेशद्वार (फोटो गुरुमंदीरच्या
वेबसाइटवरुन साभार) 
लुटले जाण्यात सुद्धा अभीमान बाळगारं कारंजा हे जगाच्या पाठीवर एकमेव शहर असावं. पुरंदरच्या तहात ठरलं की शिवाजींनी आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी. महाराजांच्या महाराष्ट्र ते उत्तर प्रदेशच्या दौ-याचा खर्च (एक लाख रुपये त्यावेळी!) औरंगजेबाने द्यावा. पण घडलं विपरीतच, चक्क महाराजांनाच आग्रात अटक केल्या गेली. पण सह्याद्री के वादळ को कोई रोक सकता क्या? महाराज सुटले अन औरंगजेबाला आपल्या दौ-याच्या खर्चाची मागणी केली (मेरे पैसे मेरे कु वापस देदे रे बाबा. तू तो खासच आदमी हय. मेरे कु आग्रा बुलाया, आरोपी बनाया और अटक किया!). पण औरंगजेबाने ऐकले नाही. शेवटी वसूली म्हणून महाराजांनी मुघलांच्या आधिपत्याखाली असणा-या कारंजा शहराची लूट केली. ४००० बैलांवर लादून संपत्ती कारंजातुन नेली असे जुणे जानकार म्हणतात.   
ज्या प्रमाणे पुण्याला विध्येचे माहेरघर म्हणतात तसेच कारंजाला सुद्धा शिक्षणाचे माहेरघर म्हणावे असा ठराव पुढच्या विदर्भ साहित्य संघाच्या अन्युअल जनरल मिटींगमध्ये मांडण्याचा आमचा मानस आहे (आमच्या विभागातले सर्व सांस्कृतीक प्रश्न विदर्भ साहित्य संघ सोडवतो, सर्व राजकीय प्रश्न नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडवते आणि या दोन्हींच्या पलिकडचे प्रश्न घेऊन आम्ही सरळ सरळ शेगावला जात असतो). कारंजातील JC, JD सारख्याशाळांच्या एका गेटमधून जाणारी चिल्लीपाल्ली काही वर्षानंतर दुस-या गेट मधून MBBS, MD, CA सारख्या हाय प्रोफाईल डिग्र्या घेऊनच बाहेर पडतांना याची देही याची डोळे आम्ही पाहिले आहे. इथे पालक आपल्या मुलांना JD, JC मध्ये अडमीशन मिळाल्याबरोब्बर वैश्नोदेवीला किंवा अजमेरच्या दर्ग्याला नवस फेडण्यासाठी जातात. एका पालकानेतर आपल्या मुलाची अडमीशन JC मध्ये व्हावी म्हणून चक्क घोर तप करुन खुद्द शंकरालाच प्रसन्न करुन घेतल्याचे सुद्धा आमच्या ऐकिवात आहे. JD, JC मधले विद्यार्थी नेहमीच “उंच माझा झोका गं” सारख्या तत्सम मराठी सिरीयल मधल्या बालकांसारखी वागतात, “अभ्यास करावयास बसावयास हवे” सारखी वाक्ये बोलतात, एक प्रश्न विचारला तर दहा उत्तर देतात इत्यादी अफवा या महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या पाल्यांचे पालक पसरवत असतात ही बाब अलाहीदा! मात्र कारंजातल्या काही मुलजी जेठा, विवेकानंद हायस्कूल, महावीर ब्रम्हचार्याश्रम सारख्या शाळा मात्र नेहमीच सिंचनाचा अनुषेश न भरुन निघालेल्या विदर्भासारख्या आम्हाला वाटतात. “जादा मस्ती किया तो आश्रम में दाल दुंगी” ही लहानपणी आम्हाला मिळालेली धमकी आम्ही पुढच्या पीढीत पासआन करुन घरातला दंगा आटोक्यात आनत असतो. KN कालेज आणि विद्याभारती कालेज ही दोन महाविद्यालये कारंजाच्या शैक्षणीक इतिहासात “तुका झालासी कळस” सारखी आहेत. दस्तूरखुद्द लेखक हे तब्बल ५ वर्ष विद्याभारतीचे विद्यार्थी राहिले असल्याने त्यांना इथल्या शिक्षणाच्या क्वालिटी अन क्वांटीटीची जवळून माहिती आहे आणि त्याबाबतीत आम्ही सद्यातरी “नो कामेंट प्लिज” च्या राजनैतिक पवित्र्यात आहोत. पण प्राद्यापक मंडळी खुप प्रेमळ होती, हे आवर्जून नमूद करुन प्रेम आणि ज्ञान ही विभीन्न टोकं आहेत हे मंडूक उपनिषदामधलं वाक्य आम्हाला आठवते आहे. असो. KN कालेज बद्दलच्या आमच्या आठवणी ह्या मात्र फारच हिरव्या आहेत. एकदा आम्हाला पर्यावरणावर भाषण द्यायला बोलवले आणि व्याख्यात्याच्या प्रत्येक वाक्यागणीक विद्यार्थ्यांनी केलेला टाळ्यांचा गजरामूळे आमचे भाषण आम्हीच ऐकू शकलो नाही हे पक्के आठवते. कारंजाच्या सांस्कृतीक विकासात जसा इथल्या शैक्षणीक संस्थांचा वाटा आहे तितकाच दरवर्षी इमानेइतबारे होणा-या शरद व्याख्यानमालेचा सुद्धा आहे. पु.ल. देशपांडेच्या शब्दात “भूईमुंगावरील किड नियंत्रणाच्या पद्धतींपासुन तर अमेरीकेची सिरीयाच्या बाबतीतली भूमिका” इतक्या प्रचंड आवाक्याची व्याख्यानं आम्ही इथेच ऐकली आहे. कारंजात सासरी गेलेल्या मुली ह्या दिवाळी दस-याला माहेरी न परतता शरद व्याख्यानमालेच्या काळात परततात अन ज्ञानाचे कण वेचून आपआपल्या सासरी परत जातात हे आमच्या माघारी आपण पोरीबाळींना विचारुन घेऊ शकता. कारंजाच्या सांस्कॄतीक अस्मितेचा एक महत्वाचा पैलू हा गुरु मंदीरात उत्सव काळात होणा-या संगीताच्या मैफली सुद्धा आहेत. अजीत कडकडे पासून तर शौनिक अभीषेकी पर्यंतच्या गायकांची अंगावर रोमांच आनणारी गायकी आम्ही इथेच अनूभवली आहे.
कारंजाच्या बाबतीत आम्ही अनेक गोष्टी वाचकांना सांगितल्या. त्या अनेक कारंजेकरांना ज्या अनुपातात आवडल्या तितक्याच गैर कारंजाकरांना सुद्धा आवडल्या. कारंजाचा आग्रह नाही हो, इतर कोठेही जन्मलो वाढलो असतो तर त्या गावाचे गुण गाईले असते हे नक्कीच. प्रत्येक गाव स्वत:त आदिम काळाचा इतिहास घेऊन धावत असतं. आपण कुठेही असलो तरी ते गाव जगण्याला आयुष्यभराचं इंधन पुरवत असतं.
शकूंतला एक्सप्रेस
परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे असं अनेकांनी लिहून ठेवलय, कारंजातही अनेक परिवर्तन घडले ज्यातील ९० टक्के परिवर्तनांनी तर आम्हाला वेदनाच झाल्या (कदाचीत आमच वय वाढत चाललं असाव!). प्रत्येक स्टेशनावर थांबत थांबत जाणा-या दोन डब्यांच्या शकुंतलेला “एक्सप्रेस” म्हणनारे आम्ही, जेव्हा पहिल्यांदा तीचं कोळशावर चालणारं इंजन बंद झालं तेव्हा शकुंतले इतकेच हळहळलो होतो (देशात सगळी कडे कोळशाची इंजन बंद झाली होती पण आमच्या शकुंतलेला त्याची माहिती सर्वात शेवटी झाली! आज मैसूरच्या रेल्वे म्युजीयम मध्ये शंकूतलेचं हृदय ठेवलेलं आहे). शतकांपासून कारंजाला पाणी पाजणा-या विहरी जेव्हा हळुहळू बाद होत गेल्या, बुजत गेल्या, ३ रुपयांचं तिकीट काढून ज्या प्रभात टाकीज अन शशीकांत टाकीज मध्ये आम्ही आमचं तरुणाइचं पॅशन अनुभवलं त्या टाकीजा जेव्हा भंगारात विकल्या गेल्या, तेव्हांच आम्ही ओळखलं आता नवीन जमाना येतो आहे, असा जमाना जिथे मित्रांच्या घरी जातांना अपाइंटमेंट घ्यावी लागणार आहे, असा जमाना ज्यात विजय होटेलमध्ये चहा पिताना विचारच करावा लागेल आपल्या तकलादू स्टेटसचा, असा जमाना जीथे संवेदनशीलतेचा अर्थ स्पर्धेत न टीकणारा असा काढल्या जाईल. पण कालाय तस्मे नम: असते हो! जुण्या वास्तू संपने, जुण्या व्यक्ती संपने म्हणजे आपल्यातला सुद्धा एक मुक कोपरा हिरमूसला होत असतो. जुणीजाणती आपल्याकडे पाहुन “थम्स अप” करणारी मोठी झाडं पडतात तेव्हा आपणही थोडे फार मरतच असतो. बन्नोरे काकांच्या दुकानात जगातलं काहीही मिळायचं, जन्मापासून तर मृत्यू पर्यंत कोणतही सामान मिळणारं हे कारंजातलं अजायबघर (त्यांना जर जेट विमानाची आर्डर दिली असती तर कोण सांगाव त्यांनी त्याला ही उपलब्ध करुन दिलं असतं!). काल परवा बन्नोरे काका गेले, आमच्या प्रगतीवर सुक्ष्म लक्ष ठेवणारा एक बुजूर्ग गेला, सराफा लाइनमधून जातांना उगाच चुकल्याचुकल्या सारखं वाटलं. देवचंद अगरचंद चं अजब गजब कटलरीचं दुकान बंद पडलं अन आम्ही थोडेसे हिरमूसलोच (गेल्या विस वर्षात किमान काही हजारांचे पेन आम्ही इथून खरेदी केले होते. कारण घेतलेला पेन एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आमच्याकडे टिकत नाही असं आम्हाला सरस्वतीचं वरदान आहे!). एखाद्या शास्त्रज्ञांप्रमाणे कारंजात रुग्नांवर उपचार करणारे डा. खोना गेले. डा. खोनांच्या दवाखाण्यात गुढ गोष्टी होत्या, एक जुणाट मायक्रोस्कोप, अनेक प्रकारच्या परिक्षण नळ्या, विचीत्र रंगांच्या रसायणांनी भरलेल्या काचेच्या नळ्या. कारंजातला पहिला फोटोग्राफीचा कॅमेरा त्यांनीच आनला होता. “अभी ३ मेगा पिक्सेल के कॅमेरे आ गये निलेश” अशी माहिती त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी जेव्हा मला दिली तेव्हा त्यांच्या भोळेपणावर फिदा झालो होतो (कारण मी नुकताच १० मेगा पिक्सेल चा कॅमेरा विकत घेतला होता!). डा. संपट हे एक उत्तम जादूगार होते देश विदेशात त्यांचे जादूचे प्रयोग व्हायचे, त्यांनी अनेक दशकांपासून कारंजात किती पाऊस पडतो याचा डेटा मेंटेन केला होता. ते सुद्धा गेल्या वर्षी गेले. गजब चे पॅशनेट लोक होते, त्यांचे अजब गजब छंद होते.
हिच ती शेवटच्या घटका मोजत असलेली
सोण्याची भांडी देणारी विहीर
आता कारंजाच्यात बकालपणा वाढतो आहे. रस्ते म्हणावे की खड्डे असा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या वेशींमधून कधीकाळी कस्तुरीने ओवरलोड झालेला ६० उंठांचा काफीला कारंजात शिरला होता त्या वेशी शेवटच्या घटका मोजताहेत. जिथे तिथे विखूरलेल्या गुटक्याच्या पुड्या, जिकडेतिकडे पसरलेली घान, मोकाटपणे रस्त्यात रवंथ करणारी जनावरं, बापाच्या पैशावर वेगाने गाड्या उडवणारी छोटी छोटी पोरं असं विभस्त दृष्य मनाला वेदना देतं. आपल्या नव वधूंसोबत ज्या ऋषी तलावात आमच्या बुजूर्गांनी बोटींग केलं होतं तो तलाव आता जणू अश्रूंनी भरला आहे. बाबरी मशीदच्या प्रकरणाच्या वेळी देश पेटलेला असतांना भाईचारा दाखवणारं कारंजं आता पुर्वी सारखं राहिलं नाही. गेल्या विस वर्षात “धक्याला बुक्की” किंवा इंट का जवाब पत्थर” ची वाढत चाललेली अखील भारतीय मानसीकता कारंजातही हळुहळू शिरते आहे. बिल्डर्सची लाबी फक्त पुण्या मुंबईत नसते ती इथेही सक्रिय होत चाललीय. प्लाट चे भाव वाढतच चालले, पैसे कमवण्यासाठी उत्पादन करण्याची गरज नाही, प्लाटसची “अलटापलटी” केली की गब्बर होता येते ही “स्युडो इकानामी” इथेही वाढत चालली, अतीक्रमणाचा विळखा सारंग तलावापर्यंत पोहोचला, मोबाइल टावर्सची संख्या वाढत चाललीय, मंदीरांची संख्या अन जुण्याजाणत्या मंदीरातलं राजकारण शिगेला पोहोचतय, काल पर्यंत सिंगल स्टोरी असणारी मंदीर ट्रिपल स्टोरी झाली पण मंदीरांकडे जाणारे रस्ते मात्र “भगवान के तरफ जानेवाला रास्ता कठीण होता है” हेच सांगतात. कारंजातली नगर परिषद देशातल्या काही जुण्या नगर परिषदांपैकी एक (११८ वर्ष जुणी) पण आता फक्त ठेकेदारांनी न केलेल्या किंवा निकृष्टपणे केलेल्या कामाची बिलं काढण्यापुरतीच उरली की काय अशी शंका आम्हाला येते आहे.
कारंजात कधीच “तकल्लूफ” नव्हता. अघळपघळ असने हा इथला स्थाई स्वभाव. पण आता “सभ्यपणा” जरा जास्तच वाढत चाललाय, सोबतच थोड्याश्या उष्णतेने वितळून जाईल अशी मेनाची पावलं सुद्धा वाढत चालली. जिथे प्रत्येक शब्द मोजून मापून वापरावा लागतो, जिथे अंतरंग संबंधांमध्ये सहजता उरत नाही अशा मानवी सहसंबंधाच्या काम्प्लिकेटेड इंटररिलेशनशीप कडे मार्गक्रमण सुरु आहे.     
उद्या कारंजात मल्टिप्लेक्स येईल पण साई व्हिडिओ ला विसरता येईल काय जीथे ६० पैशांची तिकीट काढून “एक दुजे के लिये” बघीतला होता? मॅकडोनाल्डचा पिझ्झा येईल पण फुकटे बिस्किटला किंवा शितल वाल्याच्या “इस्पेशल” बदाम ला, गुप्ताजींच्या गरम जलेबीला, बिस्मिल्लाभाईच्या पानाला, रवूफ भाईच्या चाय ला विसरता येईल काय? अनेक मन रमवनारी साधनं आली तरी कामाक्षामाता मंदीरची यात्रा, भिलखेडा मंदीरची हनुमान जयंतीची यात्रा, रामदास मठाची दस-याची यात्रा, रामनवमीची मोठ्या राममंदीरची यात्रा, गुरुमहाराज उत्सवादरम्यान भरणारी यात्रा विसरता येईल काय? नवनविन शाळा येतील पण जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघणारे विद्यार्थी निर्माण होतील काय? हजारो दोस्त निर्माण करणारी असंख्य माध्यमे येतील पण कितीही कठीण परिस्थितीत “दोस्ता साठी कायपण” असा ऋषीतलावच्या टेकडीवर पाठीवर ठेवलेला उबदार हात विसरता येईल काय?
जुन्याचा आग्रह मुळीच नाही हो, पण येणार नवीन हे विभस्त, बकाल, सौंदर्यहीन, संवेदनाहीन नसावं येवढच! 
(समाप्त)

aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

Friday, May 9, 2014

आमराई गेली कुठे?


आमराई गेली कुठे?
डॉ. निलेश हेडा

आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभून्नारिकेलान्तरम
प्राय: कणकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम
आस्तैधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रताम ।
शामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ।।

आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. फणसाच्या अंगावर काटा आला. काकडी दुभंगली. द्राक्षे संकोचाने खुजी झाली आणि जांभळे मत्सराने काळवंडली.
(सुभाषितरत्नभांडार. सहकारान्योक्तिं)
लहाणपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसने, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मधे मधे आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.
कैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका “उताऱ्याला” द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या “खुडी” घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या “झेल्यामधून” खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा. विस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकुण आंब्यांच्या चवथा हिस्सा मिळायचा. एकाच आमराईत शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानीक नावांच्या आंब्याच्या प्रजाती गुण्यागोवींदाने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्या साठी तर शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खावा तर शेप्या नावडता! उतरलेले आंबे बैलगाडीतुन घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा “माच” घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असुनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू”. सर्व जन ओरडायचे “आंबा”! दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवने आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधुन शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते? असा मोठा प्रश्न आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं साबन बनवण्यासाठी उपयोग होतो, कोणी म्हणायचं त्यापासुन तेल काढतात!
पाऊस पडण्याच्या आधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिज ची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरची लोणच्यांची चव वेगळी असायची. शाळेत आनण्याच्या डब्यांमध्ये अशी लोणच्यांची विविधता चाखण्यासारखी असायची. 
बऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले होते. जीथे आधी आमराई होती तीथेच त्यांच्या अस्थी ठेऊन एक चबुतरा बनवला आहे. आता आमराई नव्हती. अरुणावतीचा डोह गाळाने भरला होता. आंबा नसल्याने कोकीळेचा आर्त स्वरही नव्हता. आजोबा जाणे, आमराई जाणे, नदीचा डोह जाणे, कोकीळेचा स्वर जाणे यात काही परस्परसंगती आहे काय हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत होता. एक दोन ओळींची झेन कथा आठवली: एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली………………एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकी शास्त्राच्या परिपेक्षात ही कथा खरी आहे. तीच आमराईलाही लागू पडते.
विषन्न मनाने आजोबाच्या समाधी जवळ बसलो. उण्यापुऱ्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथीक विकासाचा बराच मोठा टप्पा गाठल्या गेला होता. आमराई संपली होती. विदर्भातला शेतकरी जेव्हां कर्जामध्ये आकंठ बुडाला, किटकनाशकांच्या, रासायणीक खतांच्या अवाजवी खर्चाला भागवण्यासाठी सर्वप्रथम शेतातली, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणनारा निर्णय त्याने घेतला. मातीत आधीसारखी ओल टिकत नाही म्हणून सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसुकच वाळली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. स्वस्तात मिळणारी, बाहेरुन येणारी, रसायनांनी पिकवलेली कलमी, बदाम आंब्यांनी गावराण आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसीकतेमुळे शेतकरी निरुत्साहीत झाला. आंब्याला जेव्हां बार नसतो तेव्हा भाव भरपूर, जेव्हां बार भरपूर तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी जीथे होता तीथेच राहिला. रस्त्याच्या कडेने एकेकाळी असणारी आंब्याची जुणीजाणती झाडं रस्त्याच्या रुंदीकरणात कापल्या गेली.
एकुणच काय तर जुनी मातीशी इमान असणारी माणसे माती आड गेल्याने, पर्यावरणाच अतोनात ह्रास झाल्याने आणि बाजाराच्या बदलेल्या स्वभावाने आमराई गेली.
काही दिवसांआधी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ ह्या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातातही मावनार नाही एवढा एक आंबा आनून दिला. अशी आंब्याची जात पुर्वी कधीही बघितली नव्हती. त्याचा असा गोडवा कधीच चाखला नव्हता. तश्या प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची सुबूद्धी सरकारच्या कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये याचे आश्चर्य आहे. विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ बनवले गेल्याचे मला माहित नाही. परवा एका गावाला तंटा मूक्तीचा दोन लक्ष रुपयांचा धनादेश मिळाला. आलेल्या पैशात मोठे प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. माझा एक पर्यावरण प्रेमी मीत्र म्हणाला गावच्या इ क्लास जमीनीवर गावराण आंब्यांची आमराई उभारुया. दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराईच्या पुनरनिर्मानाच्या दिशेने एक पाऊल सुद्धा टाकल्या जाईल. ज्या प्रमाणे नक्षत्र वन, स्मृती वनाच्या दिशेने आपली वाटचाल आहे तशीच वाटचाल आमराईच्या बाबतीतही व्हायला हवी. हराळ गावच्या दूर्मिळ आंब्याच्या जातींची कलम करुन त्याला संरक्षीत करता येईल. गरज आहे जुण्या पर्यावरणीय गोष्टी नष्ट होणार नाहीत, त्या जुण्या गोष्टींचं सांस्कृतीक, पर्यावरणीय महत्त्व आहे अशी मानसीकता बनवण्याची.

Sunday, February 2, 2014

गवत  अन संध्याकाळ

डॉ. निलेश हेडा
सायंकाळी गावालगतच्या बोडीच्या काठावर जावून बसलो. समोरुन सरसर ६-७ फुट लांबीची धामन सरपटत गेली. पावसाळा संपून गेला होता. नोव्हेंबरचा दुसरा आठवडा. थंडी पडायला नुकतीच सुरुवात झाली होती. हलका धान कापायला आला होता. भारी धान कापायला येणार होता. हा दिपावलीचा महिणा. हिंदू धर्मा प्रमाणे पंचांगानुसार इथे दिपावली साजरी होत नाही, लोक ठरवतात आणि त्या दिवशी सारं गाव दिवाळी साजरं करतं. समोर क्षितीजावर सूंदर नक्षी काढून ठेवली होती. मनाला एक प्रकारची तंद्री लागली होती. समोर दाट हिरवंकच्च जंगल आत्ताच येउन गेलेल्या पावसाने यौवनात आलं होतं. “हे जंगल आमची आई”, देवाजींचं वाक्य आठवलं, जंगल टिकेन तर आदिवासी टिकेल, त्याची संस्कृती टिकेल. बोडीच्या काठावरचं बाभळीचं झाड पिवळ्या फुलांनी सजलं होतं. साधेपनात सौंदर्याची ती जीवंत अभीव्यक्ती होती. संपूर्ण झाडं आवाजाने भरुन गेलं होतं, चिमण्यांचा प्रचंड मोठा थवा त्यावर विसावला होता. नजरेने दिसत नव्हता पण आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होता. संपूर्ण झाडात खूळखुळे लावले आहेत असा भास होत होता. ह्या चिमण्यांची ही शत्रूंना आपली ताकद दाखवण्याची पद्धती होती. आम्ही एकटे नाहीत, खबरदार इकडे नजर टाकली तर! जीतका आवाज मोठा तीतके शक्ती प्रदर्शन मोठे. आता लवकरच हे झाड शांत होणार होतं, जणू रात्रीच्या कुशीत बिधांस्तपणे झोपलेल्या बाळासारखं.
हळुहळू सायंकाळ घरी परतायला लागली. आवाज बदलायला लागले. गुरं ढोरं जंगलातुन घरी परतायला लागले. तलावाच्या पलिकडच्या काठावर काही परदेशी पाणपक्षी अजुनही चरत होते. अंधार पडायला सुरुवात होवूनही त्यांना घरी परतायची घाई दिसत नव्हती. घरा कडे जायला निघालो. रस्त्यात गुरांना घेउन येणारा प्रभाकर मडकाम भेटला. हा मेंढ्यात घरजावई म्हणून आलेला. गुरं चारायचं काम करणारा तो गायकी, दिवसभर राणावनात गुरांसोबत राहणारा. दिवसभर डाला कोडोई, तेलीन हुक्के, पोनाळ खळ्या, तीतेर आदिन, खारा गोटा, मोलोल कोहोडा इत्यादी ठिकाणी गुरे चारुन घरा कडे चालला होता.  त्याच्याशी गप्पा मारायला लागलो.
आता आधी सारखं जाडी (गवत) राहिलं नाही. बोदाखार, मुचीयाल नावाचं गवत तर संपायला आलं आहे.
का? मी.
जंगल वाढलं, झाडं वाढली, गवत कमी झालं, मांसाहारी प्राणी कमी झाले, शाकाहारी प्राणी वाढले अन गवत कमी झालं.
’अजून?
आता बघा. आठ दहा गावाचे जनावरं मेंढ्यात येउन चरतात....... तुकूम, कन्हारटोला, लेखा, करकाळा, हेट्टी, तोडे...............गवत कमी होणारच नाही?
त्याने अगदी मोजक्या शब्दात गवत कमी होण्याची कारणं सांगीतली होती. हे त्याचं विवेचन त्याच्या भटकंतीचा आणि प्रत्यक्ष निरिक्षणाचा सार होता, ते त्याचं “प्रॅक्टीकल इकालॉजीकल” ज्ञान होतं. तो “बेअरफुटेड इकालॉजीस्ट” होता.
मत्रू दूगा हा असाच गवतांचा तज्ञ. चांगल्या वनस्पती शास्त्रज्ञालाही गवत म्हटलं की भिती वाटते. गवताला ओळखने म्हणजे जिकरीचं काम. मात्र मत्रू दूगा ३० ते ४० गवतांचे प्रकार सहजपणे सांगून जातो. मंडा जाडी, बोदाल जाडी....... आधी गोंडांच्या झोपड्या गवताने शाकारलेल्या असायच्या. ह्या झोपड्या वातानुकूलीत घराचं काम करायच्या. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम. आता मात्र कवेलू आणि कुठे कुठे टिनाचे पत्रे यायला लागलेत. समाज आपले नवे रस्ते शोधून घेतो, विकल्प शोधून घेतो.
कौस्तूभने विदर्भ शब्दाची व्युत्पत्ती सांगीतली होती: विदर्भ म्हणजे विपूल दर्भांचा प्रदेश. अजुनही वाशिम अकोला जिल्ह्यात चांगले गवताळ प्रदेश आणि त्यावर अवलंबुन असणारे प्राणि टिकुन आहेत. तणमोर, काळविट, निलगाय सहजपणे दृष्टीला पडेल असा हा प्रदेश. पण गवताळ प्रदेश म्हणजे पडीत जागा असा गैरसमज होवून गवताळ प्रदेश संपवून त्यांचे रुपांतर शेतीत केल्या गेले.
गवत वाचवण्यासाठी काय करता येईल? मी
गस्ट ते नोव्हेंबर ह्या महिण्यात चराई पुर्णत: बंद पाहिजे, ह्या काळातच गवताची वाढ होवून ते पुर्णत: पिकतात.
हेच तर आधूनिक परिस्थितीकी शास्त्राचं मत आहे. हेच प्रभाकर मडकाम, मत्रू दुगा सांगत होता.
डोक्यात हे संभाषन साठवून खोली वर आलो. सुर्य जंगलाच्या समुद्रात लपताच थंडी वाढायला लागली. रुम वर पोहोचताच मणिराम दुगाचा मुलगा जेवण तयार झाले म्हणुन बोलवायला आला. मी मणीराम कडे ’पेइंग गेस्ट’ म्हणुन राहत होतो. मणिरामचं घर आदिवासी आणि आधुनिक जीवन शैलीचा सुरेख संगम आहे. ग्रामसभेच्या इमारती शेजारी, प्राथमिक शाळेच्या पुढे, मोक्याच्या ठिकाणी त्याचं घर. घरात विज, टी.व्ही अन गोबर गॅसची सोय. मणिरामला दोन अपत्य शितल बारा वर्षांची अन गुरुदेव १० वर्षांचा. गुरुदेव अन शितल सदासर्वदा माझ्या खोलीवर असायचे. त्यांना संगणक शिकवने, त्यांचे इंग्रजीचे पाठ घेणे अशी माझी जबाबदारी. गुरुदेव चांगलाच संगणक शिकला होता. मणीराम दहावी पर्यंत शिकला सवरलेला, शांत, समजदार, जबाबदार व्यक्ती, त्यामुळे ग्रामसभेचा सर्व हिशोब तोच ठेवायचा. मणिरामच्या घराच्या शेजारीच त्यांच्या वडील अन भावाचे घर. आदिवासींमध्ये मुलाचं लग्ण झालं की ते वेगळे राहायला सुरुवात करतात. त्या वेगळेपणात एक प्रकारची सहजता असते.
आदिवासींची घरं म्हणजे विविध प्रकारच्या जैविक अजैविक घटकांची एक सुंदर व्यवस्थाच असते. घराच्या आवारात बक-या, गुरं ढोरं, कुत्रे, कोंबड्या यांच्या विशिष्ट जागा असतात. घराबाहेर डुकरांचा “पदगुडा” असतो. देवाची एक वेगळी खोली असते त्यात विविध प्रकारचे आदिवासी देव गुण्यागोविंदाने नांदत असतात. मात्र घरात साईबाबा, बजरंगबली, गणपती ह्या हिंदू देवानाही मानाचं स्थान असतं. अंगणात मांडव टाकलेला असतो त्यावर भोपळ्याच्या, वालाच्या वेली चढलेल्या असतात. भोपळ्याच्या वेलीतले बरेचशे भोपळे जंगलात पाणी नेण्यासाठी वेगळे ठेवलेले असतात ते आदिवासींचे “थर्मस”. मांडवाच्या मध्यभागी नक्षीकाम केलेला “मूंडा” गाडलेला असतो. कधी कधी ह्या मुंड्यांची संख्या एका पेक्षा जास्त ही असते. घराच्या मागच्या बाजुला परसबाग त्यात मका, वांगे, टमाटे, वालाच्या वेली फुललेल्या असतात. संपुर्ण घर बांबूच्या कुंपनाने वेढलेलं असतं. आजकाल प्रत्येक घरात नहाणी, संडास अन गोबर गॅसची सोय झालेली आहे.
मणीरामच्या अंगणातल्या मुंड्याचा विषय निघाला.
ह्या मुंड्याला किती वर्षे झालीत? मी.
झाली असतील आठेक वर्षे. मणीरामची पत्नी कमलताई म्हणाल्या.
म्हणजे लग्नाला आठ वर्षे झालीत. पण शितल तर १२ वर्षांची आहे. हे कसं? माझा प्रश्न.
आम्हाला लग्नाआधीच मुलगी झाली होती. मुलं होण्यासाठी लग्नाची काय आवश्यकता? जेंव्हा परिस्थिती चांगली असते तेंव्हाच लग्न करायचं. जर प्रेम झालं तर एकत्र राहनं सुरु करता येते. जेंव्हा शक्य होईल तेंव्हा लग्न करता येते. त्यामूळे मणीरामच्या लग्नात त्यांची मूलगी २-३ वर्षांची होती.
आता प्रत्येक घराच्या बाहेर शेकोट्या पेटल्या होत्या. त्या आता रात्र भर पेटत राहतील त्या शेकोटीच्या भोवती बक-या, मांजरी, कुत्री आणि एखादा म्हातारा पहूडलेला असतो.
जेवन करुन खोलीवर परतलो. शेकोटी पेटवली. खोलीत हळुहळू उब यायला लागली.
झोपी जातांना विचार येत होते. माणसाच्या आदिम काळाच्या चित्रासारखं हे सारं काही. त्या चित्रात एक परस्परांवर अवलंबून असलेलं कुटूंब आहे. त्या कुटूंबाच्या बाहेर एक उबदार असं सामाजीक विश्व आहे. त्या सामाजीक विश्वाच्या आणि व्यक्ती आणि कुटूंबाच्या रेषा एकमेकात नामालुमपणे मिसळलेल्या आहेत. माझं जीवन आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगेन हा अट्टाहास नाही. इथे संसाधन मिळविण्यासाठी संघर्ष आहे पण त्या संघर्षात सहजता आहे. निसर्गाची आव्हानं ही सहजतेने स्विकारल्या जातात. इथे तथाकथीक “मेन स्ट्रिम” शिक्षण वगैरे काही नाही पण तरीही ज्ञानाचं लख्ख तेज आहे आणि त्याला विनयशिलतेची सुंदर झालर आहे.

Friday, January 17, 2014

डोळे बंद करुन कसे चालेल ?

सिंचन आणि तेही विदर्भातले हा राजकारण्यांचा जिव्हाळ्याचा मुद्दा; पण गेल्या अनेक वर्षांची आकडेवारी सांगते की सिंचनाचा प्रश्न जसा आहे तसाच आहे. सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जी मोठ्या धरणांची कास धरल्या गेली त्याने केवळ देशाचं आणि समाजाचं नुकसानच झालं आहे हे अजुनही आम्हाला समजत नाही हे आपलं दुर्दैव. सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी लहान लहान पातळ्यांवरच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने आज आपण जिथे आधी होतो तिथेच आहोत. डोळे खाडकन उघडून टाकणारं एक तथ्य आपण बघुया, १९९१-९२ ते २००३-०४ दरम्यान भारत सरकारने सिंचनासाठी मोठ्या धरणांवर सुमारे १००,००० कोटी रुपये (एक लाख कोटी!) खर्च केले आहेत पण आश्चर्याची बाब अशी की ह्या बारा वर्षांच्या कालावधीत कालव्याद्वारे होणारे सिंचन एका एकरानेही वाढले नाही! उलट ते कमी झाले. गस्ट १९८६ मध्ये विविध राज्यांच्या सिंचन मंत्र्यांसमोर केलेल्या आपल्या भाषणात स्व. राजीव गांधीनी म्हटले होते की, “शायद, हम विश्वास से कह सकते है कि इन परियोजनाओं से लोगों को कोई फायदा नहीं हुआ है. सोलह सालों से हमने धन गंवाया है. सिचांई नहीं, पानी नहीं, पैदावार में कोई बढ़ोतरी नही, लोगों के दैनिक जीवन में कोई मदद नही, इस तरह उन्हें कुछ भी हासिल नही हुआ है.”
गेल्या बारा वर्षात केलेला खर्च जर जल संधारणाच्या स्थानिक लोक आधारित, विकेंद्रित स्वरुपाच्या कामांवर केला असता, गावागावातील मृत होत चाललेले छोटेमोठे पारंपरिक तलाव संरक्षित केले असते आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याला प्राथमिकता दिली असती तर भारताचं चित्र काही वेगळच असतं.  
आज आपण प्रामुख्याने भूगर्भातील पाण्यावर आपल्या सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि कारखान्यांना लागणा-या पाण्यासाठी अवलंबून आहोत. बोअरवेलद्वारे पाण्याचा अविरत उपसा भारतभर सुरु आहे. संपूर्ण भारतात १९ दशलक्ष बोअरवेल आहेत (जुलै २००९ ची आकडेवारी). अशा परिस्थितीत जास्त तार्किक आणि परिणामकारक काम कोणतं असू शकते? तर जमिनीतील पाण्याची पातळी पुन्हा भरुन काढण्यासाठी जास्तीत जास्त जल पुनर्भरणाची कामे, जल संधारणाची कामे करावित. रोजगार हमी योजनेची प्रभावी अमलबजावणी व छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे सारख्या कामांनी हे शक्य आहे. परंतु दुर्दैवाने संपूर्ण भारताचा विचार केला तर जल पुनर्भरनाचे कोणतेही प्रभावी धोरण सरकारने तयार केले नाही. गेल्या १३ वर्षांपासून भारत सरकारचे केंद्रिय भुजल प्राधीकरण (Central Ground Water Authority) अस्तित्वात आहे पण सरकारी गैरजबाबदार पद्धतीने चालणा-या ह्या विभागाने आजवर भुजलाच्या बाबत कोणतेही प्रभावी धोरण दिलेले नाही.  
खरं म्हणजे मागील काही काळांपासून मांसूनचे बिघडलेले चक्र हा जागतिक तापमान वाढीचा दृष्य परिणाम आहे हे आता सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांआधी जगातील अनेक शास्त्रज्ञांनी फार मोलाचं संशोधन करुन पृथ्वीचे तापमान वाढण्याचा व त्याच्या मानवजातीवरच्या परिणामाचा आलेख जगासमोर मांडला. आसपासच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात सोडलेल्या कार्बन डाय क्साईड व मिथेन ह्या वायूमूळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे. ह्या तापमान वाढीमूळे लाखो वर्षात स्थापित झालेल्या निसर्ग चक्रात फार मोठा बदल झाला आहे.
हवेत वाढलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचा आणि तापमान वाढीचा काय संबंध असावा? सूर्यापासून प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीला उष्णता प्रदान करतात. परंतु आलेली सारीचं किरण पृथ्वीवर येत नाहीत तर त्याचा बराचसा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन परावर्तित होऊन परत अवकाशात जातो व पृथ्वीचे सरासरी तापमान व्यवस्थित राखल्या जाते. परंतु कार्बन कार्बन डाय क्साईड पृथ्वीच्या वातावरणात पसरुन राहिल्याने परत जाणा-या प्रकाश किरणांना तो शोषून घेतो व उष्ण किरणांच्या स्वरुपात परत पृथ्वीकडे देतो, परिणामत: पृथ्वीचे तापमान वाढते.
अभ्यासक मानतात की, ह्या तापमान वाढीने मान्सून, जो आपला जीवनाधार आहे, त्याचे चक्र बिघडेल. अतिशय जास्त पाऊस किंवा अतिशय कमी पाऊस अशी परिस्थिती निर्माण होईल. ज्याची सुरुवात झाल्याचे दिसते आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपीकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) नावाच्या संशोधन संस्थेने सायंसनावाच्या संशोधन पत्रिकेत २००६ मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रानुसार अतिवृष्टीचे प्रमाण गेल्या ५० वर्षात १० टक्क्यांनी वाढले आहे. बॅंगलोर येथील द सेंटर फॉर मॅथेमॅटीकल मॉडलींग अॅंड कांप्युटर सीमुलेशननावाच्या संशोधन संस्थेने मार्च २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात दर्शवले की भारतातल्या शुष्क भागात उदा. दक्षिण गुजरात, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षिण ओरीसा, अतिवृष्टीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. हे सारे बदल पृथ्वीचे तापमान वाढल्याने होत आहे. पृथ्वीच्या तापमान वाढीचा आणि मांसूनच्या चक्रात बदल होण्याचा काय संबंध आहे? तिरुपती येथील नॅशनल एटमॉसफेरीक रिसर्च लेबारेटरीच्या शास्त्रज्ञांनी ह्या घटनेचे गूढ उकलण्याच्या दृष्टीने बरीच मजल मारलेली दिसते. ’जिओफीजीकल रिसर्च लेटरनावाच्या जरनल मध्ये २० सप्टेबर २००८ ला प्रकाशित झालेल्या संशोधन पत्रात ते लिहितात की, २६ जुलै २००५ ला एका दिवसात मुंबई शहरात झालेला ९४४ मि.मी. इतका न भुतो न भविष्यती असा पाऊस ह्या घटनेची सुरुवात होती (पश्चिम विदर्भात वर्षभरातही इतका पाऊस पडत नाही). मांसूनचे चक्र हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. गेल्या १०४ वर्षांच्या आकडेवारी नुसार, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत गेल्याचे दिसते आणि त्याच वेळी अतिवृष्टीचे प्रमाणही. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत चालल्याने समुद्रातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे त्यामूळे तयार झालेली प्रचंड वाफ तापमान कमी होताच पाऊस बनून एकाच ठिकाणी कोसळते आणि काही ठिकाणी अतीवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. गेल्या varshi परतीच्या मांसूनने दक्षिण भारतात केलेला कहर याचे अगदीच जवळचे उदाहरण आहे.
त्यामूळे मांसूनचा पाऊस आता असाच लपाछपी खेळत राहणार हे कटूसत्य प्रत्येकाने समजुन घेतले पाहिजे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम सुरु झाले आहेत. जितका थोडा थोडका पाऊस पडेल तो जास्तीत जास्त जमिनीत कसा मुरेल याकडे लक्ष देण्याची सरकार आणि जनता दोघांचीही जबाबदारी आहे. रोजगार हमी योजने सारख्या योजना व्यवस्थित राबवून, वैयक्तिक स्तरावर घराच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरवून कमी पावसाला सुद्धा जपून ठेवता येईल. जागतिक तापमान वाढीच्या काळ्यासावल्यांचं यूग आता सुरु होत आहे. या यूगात आपल्या सवयी बदलवनं आणि जागतिक संकटाचा स्थानिक परिणाम जास्तीत जास्त कुशलतेने स्थानिक ठिकाणीच दूर करणं इतकच आपल्या हातात आहे.
अशा संक्रमण काळात निकटगामी आणि दुरागामी रणनीती अंतर्गत अनुरुप व्यवस्थापनाच्या (Adaptive management) तत्वाला अनुसरुन आपण काय करु शकतो ह्याचा समाजातल्या सर्व स्तराने गंभीर विचार करण्याची गरज आहे. जी विकासाची संकल्पना सरकार, सर्व सामान्य जनता आणि समाजासाठी झटणा-या स्वयंसेवी संघटनेने अनेक वर्षांपासून जोपासलेली आहे त्याचा बारकाईने विचार करणे व त्यातील फोलपणा व्यापक समाजात पसरविने जरुरीचे आहे. पर्यावरणाच्या प्रश्नांच्या बाबतीत जनमानसात जन जागृती करण्यासाठी आग्रही व आक्रमक पद्धत व भूमिका अवलंबण्याची गरज आहे. जल संरक्षण, छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे, जल संधारण हा आता ऐच्छिक मुद्दा उरला नाही ही आता अपरिहार्यता आणि आग्रहाची बाब झाली आहे.



शेतीचा पर्यावरणीय अंगाने विचार कधी करणार?

डॉ. निलेश हेडा

आपले शेतीचे आणि पर्यायाने शेतक-यांचे अनेक प्रश्न वृहद अशा पर्यावरणीय प्रश्नांचा एक भाग आहे हे विसरुन आपण वाटचाल करत आहोत. शेतक-यां सोबत काम करणारे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा ह्या मुलभूत अशा सत्या कडे पाठ फिरवून उभे आहेत आणि जणू शेती म्हणजे केवळ आणि केवळ मानव निर्मित धान्य निर्मितीचा कारखाना आहे अशा चुकीचे दृष्टीकोनाने काम करत आहे.
शेती ही एक मानव निर्मित परिसंस्था (Ecosystem) आहे. कोणतीही परिसंस्था ही अक्षरश: लाखोअशाजैविकआणिअजैविकघटकांचीबनलेलीअसते. परिसंस्थेत जैविक आणि अजैविक घटकात एक प्रकारचे संतुलन असते. ह्यातला एक घटक दुस-या घटकाला सतत पदार्थ आणि उर्जेची देवानघेवान करत जगत असतो. परिसंस्थेमधल्या जैविक घटकात अनेक प्रजातींचा समावेश होतो. पिकांच्या विविध जाती, त्यावर येणारी कीड, शेतीशी संबंधीत विविध जंगली व पाळीव पशुपक्षी, प्राणी यांनी शेतात एका अन्नसाखळीचा (Food Chain) उदय होतो, अनेक अन्नसाखळ्या जोडल्या जाऊन अन्नजाळ्याची (Food Web) निर्मिती होते. ही नैसर्गिक संरचना निसर्गाला निर्माण करण्याकरीता अनेक कोटी वर्षे खर्च करावी लागलीत हे उत्क्रांतीशास्त्र आपल्याला सांगते. “जिवोजिवश्चजिवनम” हे निसर्गातले चक्र शेतीतही बघायला मिळते. अशा अन्नसाखळीत आणि नैसर्गिक संरचनेत दोष निर्माण झाला की मग शेतीच्या अंतहीन प्रश्नांना सुरुवात होते हे तत्व आता समजुन घ्यावे लागेल. जैवविविधता म्हणजे जीवाजीवांमध्ये असणारी विविधता. तो जसा निसर्गाचा प्राण आहे तसाच तो शेतीचा सुद्धा मूळ गाभा आहे. निसर्गाचा स्वभाव हा एकसुरीपणाकडून विविधतेकडे जाण्याचा आहे. शेतीचा सुद्धा तोच प्राण होता. पण केवळ बाजारपेठेच्याआहारीजाऊनजीएकसुरीपणाचीशेतीबाजारपेठेनेशेतक-यांच्या हाती दिली त्या एकसुरीपणातुन विशिष्ट किटक वाढून अचानक रोगांनी शेतीचसंपूनतरजाणार नाहीनाअशीभितीनिर्माणझालीआहे.
सर्वव्यापक अशा नैसर्गिक व्यवस्थेतला शेती हा एक छोटासा भाग मात्र आहे हे आपण विसरायला नको. 3.५ अब्ज वर्षां आधी समुद्रात पहिल्या जीवाचा जन्म झाला आणि त्यानंतर सुरुवातीला एकसारख्या दिसणा-या जीवांनी विविध रुपधारण केले आणि आज अतीषय समृद्ध आणि विविधतेने नटलेली जीवसृष्टी आपण बघतो. त्या मानाने शेती फारच नवीन असा मानवाचा कार्यकलाप आहे. मागच्या केवळ १० हजार वर्षांआधी शेतीची सुरुवात झाली. आणि मागच्या केवळ ३० ते चाळीस वर्षात शेतीचा संपूर्ण चेहरा मोहरा आपण बदलऊन टाकला. बियांनाच्या पारंपरिक जाती नष्ट करुन टाकणे, शेतीसोबतच पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर विष पेरणे अशा विघातक बदलाने संपूर्ण शेतीची शाश्वतता भंग करुन टाकली आहे.
शेतकयांच्या दूरावस्थेत सरकारी धोरणात्मक बदलाचा निश्चितच फार मोठा हात आहे पण केवळ तेच एक कारण आहे असे माणून इतर पर्यावरणीय कारणांकडे डोळेझाक करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. ह्या देशात सरकारच्या धोरणात्मक चुकीविरुद्धलढण्यासाठी शेतक-यांची प्रचंड मोठी उर्जा कारणी लावल्या गेली. ते चांगलही होतं. त्याने शेतकयांना प्रचंड मोठा आत्मविश्वास दिला यात दुमत नाही पण सोबतच पर्यावरणीय अंगाने शेती प्रश्नाचा विचारच केल्या गेला नाही. तसा विचार करण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त सुद्धा केले गेले नाही. त्यामुळे शेतीला केवळ एक उत्पादन देणा-या कारखाण्या चे स्वरुप आले. त्यामुळे उत्पन्नात तात्पुरती वाढ नक्कीच झाली पण दुरागामी परिणामात मात्र आपले नुकसानच झाले.
समजा शेतक-यांचे सरकार आले. शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. शेतीला शेतकरी जो भाव मागतात तो मिळाला. तरी शेतकरी सुखी होईल याची शाश्वती कोणी देऊ शकतो काय? इतकं होऊन अचानक रोग आला, पाऊस आला नाही, किंवा जास्त आला, जमीनीची उत्पादकता कमी झाली तर काय करणार? अशा परिस्थितीत अनुरुपव्यवस्थापनाचे (Adapative Management) लवचीकतत्व आपण अंगीकारायला पाहिजे. सरकार आणि व्यवस्थेसोबतची लढाई सुरु ठेवायला हवी पण त्याच सोबत निसर्गानुकूल शेतीच्या प्रयोगाचा जास्तीत जास्त प्रसार सुरु ठेवायला हवा.   
आता शाश्वत शेतीच्या विचाराची गंभीर चिकित्सा करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा नाश करुन शेती हा कधीच फायद्याचा व्यवसाय होऊच शकत नाही. आधुनिक शेतीत जरी निकटगामी भरपूर फायदा दिसत असला तरी दूरागामी आणि येणा-या पिढ्यांचा विचार केला तर ते शाश्वत नाही हे आता हळुहळू सिद्ध व्हायला लागले आहे. माझ्या मते सद्याची शेती ही धोक्यात असलेली परिसंस्था बनली आहे. परिसंस्था जेव्हां नाजूक बनते तेव्हा विनाश होतो. अशा परिस्थितीत पर्यावरणानुकूल शेतीवरच भर द्यावा लागेल. शाश्वत शेतीत फायदा मिळत नाही हे बाजारपेठेने पसरवलेले ’मिथ’ झटकून टाकावे लागेल. परिसंस्था, जैवविविधता, शाश्वत विकास, अन्नसाखळी, पर्यावरण संतूलन, इत्यादी शब्द केवळ अभ्यासका पुरते प्रयोग शाळांच्या चार भिंतीत न राहता त्यांना शेतात न्यावे लागेल. तेव्हांच शेती शाश्वत होईल.


(लेखक निसर्ग अभ्यासक आणि रुफोर्ड मॉरिस फाउंडेशन, लंडनचे नदी अभ्यासाच्या बाबतीतले फेलो आहेत.)

लोक ज्ञानाचे महत्व


लोक ज्ञानाचे महत्व आता जगभरात मान्य व्हायला लागले आहे. इथे मी, मेंढ्यात आणि आसपास अनुभवलेला लोकज्ञानाचा एक आलेख मांडणार आहे. ह्याचा मुख्य भर हा मास्यांच्या अनुषंगाने मी केलेला अभ्यास हा असणार आहे. मासे, नदी आणि माणुस हे तीन माझ्या पीएचडीचे महत्वाचे घटक होते. निसर्गाचा अभ्यास हा एकांगी होवू नये, अनेक घटकांचे परस्पर संबंध समजुन घेतल्यावरच एक चित्र तयार करता येउ शकते ही विचारसरणी आता परीसर विज्ञानात आपला जम बसवू लागली आहे. पुर्वीच्या काळी जी निसर्ग अभ्यासाची पद्धत होती तीला शास्त्रिय भाषेत ’फ्लोरीस्टीक अ‍ॅंड फौनीस्टीक अप्रोच’ असे म्हणतात. म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणचा अभ्यास हा तीथल्या प्राणी वनस्पतींची यादी करुन करायची. गेल्या काही दशकात खास करुन उपग्रह चित्रांचे प्रचलन आल्यानंतर अभ्यासाचा रोख हा केवळ सजीव घटक न राहता त्यांचे अधिवासांचाही समावेश त्यात केल्या जायला लागला. ज्याला परिसर विज्ञानात ’लॅंडस्केप इकॅलॅजी’ (भूभाग परिस्थितीकी!) म्हणतात. पृथ्वी परिषदेनंतर इकोसीस्टम अप्रोच (परिसंस्था पद्धती) ची संकल्पना आपले मुळ धरु लागली आहे. या पद्धतीत परिसंस्थेचे जास्तीत जास्त घटक विचारात घेतल्या जातात. निसर्ग संवर्धनात या तात्वीक प्रणालीचं बरचं महत्व आहे. कारण निसर्ग म्हणजे अनेक गोष्टींची एक सुचारु व्यवस्था आहे. यात एका घटकात निर्माण होणाऱ्या बदलाचा दुसऱ्या घटकावर परिणाम पडतोच. परिसंस्था म्हणजे एक परस्पर अवलंबून असणाऱ्या हजारो घटकांची सुचारु व्यवस्था. किती विभीन्न घटक यात असु शकतात? यात भौतिक घटक असतील उदा. वातावरण, हवेचा वेग आणि दिशा, माती इत्यादी. यात परिस्थितीकीय घटक असतील उदा. भक्ष आणि भक्षकांचे सहसंबंध, अंकुरण्याचा वेग इत्यादी. यात सामाजीक घटक असतील उदा. संस्कृती, परिवार, धर्म इत्यादी. यात राजकिय घटक असतील उदा. सरकारी यंत्रणा, राजकिय व्यवस्थेचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन इत्यादी. यात अर्थशास्त्रिय घटक निगडीत असतील उदा. रोजगाराचा प्रश्न, बाजारपेठेची मागणी इत्यादी. यात काही असेही घटक निगडीत असु शकतात ज्या बद्दल आपण कोणते भविष्य वर्तवू शकत नाही उदा. भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव. मेंढ्यात अहींसक पद्धतीने मध गोळा करण्याच्या वेळी लोक आणि जंगल अभ्यास गटाचे सभासद एका गोष्टीवर येउन पोहचले की, मध माशांचे मध जर आपण चुकीच्या पद्धतीने काढत असु तर मधमाशा संखेने कमी होतात, मध माशा कमी झाल्याने परागीकरणावर विपरीत परिणाम होतो, परागीकरण कमी झाल्यामुळे झाडांची संख्या कमी होवू शकते, त्यावर अवलंबुन असणाऱ्या पशू पक्षांची संख्या कमी होवू शकते, म्हणजेच काय तर संपुर्ण जैवआवरणाला एका गोष्टीमुळे परिणाम भोगावे लागु शकतात. अशा प्रकारच्या समग्र समजेच्या दिशेने आता परिसर विज्ञान वाटचाल करते आहे. आदिवासीं मध्ये अशी समज उपजतच असते असे वाटते. निसर्ग एक एकक म्हणुन त्याच्या कडे बघणे. ’जंगलाला आग लागल्याने मासे कमी होतात’ हे विधान मी करायला लागलो तर तुम्ही मला वेड्यात काढाल. पण मेंढ्यातल्या जाणकार लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हे खरं आहे, उन्हाळ्यात जंगलाला आग लागुन भरपुर प्रमाणात राख निर्माण होते, पावसाळ्यात ही राखं पाण्यात मिसळते नदी नाल्यात पडते, तीथल्या राखेच्या पाण्यात मासे तडफडुन मरतात. थोडक्यात काय तर निसर्ग हा अनेक घटकांचा आणि घटनांची एक क्लिस्ट असं यंत्र आहे, ज्याला समजुन घेण्यासाठी निसर्गातील विविध घटकांना विचारात घेणे अत्यावश्यक आहे.
जवळ जवळ ६० हजार वर्षांआधी माणसाने भाषेचा शोध लावला असावा, ह्या क्लिष्ट अशा प्रतिकात्मक भाषेच्या उगमासोबतच माणसाने आधुनिक ज्ञान व्यवस्थेची मुहुर्तमेढ केली असं आपल्याला म्हणता येईल. जवळपास १० हजार वर्षांच्या आधी, जेंव्हा शेतीची सुरुवात झाली, त्याआधी मानसाचे विविध समुह हे छोट्या छोट्या गटात, एक जीनसी स्वरुपात, वास्तव्यास होते. विविध प्रकारच्या समुहात फारसा काही संबंध नसावा कारण ते वेगवेगळ्या भाषा बोलायचे. त्यामुळे ज्ञानाचे प्रवाह हे प्रत्येक समुहासाठी आपआपले भिन्नभिन्न होते आणि विविध समुहातील ज्ञानात फारशी देवाणघेवाण नव्हती. पण शेतीच्या आणि पशुपालनाच्या सोबतच विविध माणवी गटातील एकटेपणा दुर व्हायला लागला आणि विविध गटांचे परस्परांशी संबंध स्थापण व्हायला लागले. ह्यामुळे विविध ज्ञानाचे प्रवाह एकत्र यायला लागले असावेत आणि खास प्रकारच्या ज्ञानाची जोपासणा करणाऱ्या लोकांचे समुह निर्माण व्हायला लागले, उदा. वैदू इत्यादी. अशा प्रकारे शिकारी आणि भटक्या अवस्थेतील माणसाने शेती करायला सुरुवात करताच विविध प्रकारच्या ज्ञानाच्या प्रवाहांनी एकत्र येउन ज्ञानाचा एक विषाल असा साठा निर्माण झाला असावा. जगभरात आदिवासी लोक अशा मौल्यवान ज्ञानाचा साठा आपल्या जवळ बाळगुन आहेत. गेल्या काही दशकात अशा निसर्गाविषयक पारंपारिक ज्ञानाला बरच महत्व प्राप्त झालं आहे.
निसर्गाविषयक ज्ञान हे भौतीक शास्त्रातील ज्ञानाप्रमाणे नसते, ते स्थल काल सापेक्ष असते, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाबद्दल फारशी भविष्यवाणी करणे शक्य नसते. हवामान शास्त्राचचं आपण उदाहरण घेउया, विज्ञानाने इतकी प्रगती केली तरी अजुनही पावसाचा, चक्री वादळाचा, भूकंपाचा, त्सुनामीचा पक्का अंदाज बांधने आपल्याला कीतपत शक्य आहे? आपण केवळ जुण्या आकड्यांवरुन एक प्रकारचा अंदाज वर्तवू शकतो. अशा वेळी निसर्गाबद्दल सतत निरीक्षण करत राहुणच काही अंदाज बांधता येउ शकतात. आजच्या परिपेक्षात जर विविध अधिवासांचं त्यातील विविध जीवजातींसह व्यवस्थित व्यवस्थापण करायच असेल तर लोक ज्ञान, पारंपारिक ज्ञानाशिवाय पर्याय नाही.
असो, तर धिवर आणि गोंड लोकांचं मास्यांबद्दलचं, आणि एकुणच नदी बद्दलचं ज्ञान गोळा करण्यात मला रस होता. ह्या साठी सर्व प्रथम लोकांना किती प्रकारच्या मास्यांच्या प्रजाती माहित असतात हे मी जानुन घ्यायला सुरुवात केली. अभ्यासादरम्याण असं जाणवलं की गोंडाना ४३ जातीचे मासे तर धिवरांना ६३ जातींच्या मास्यांची माहिती असते (मास्यांची यादी शेवटी जोडली आहे). अगदीच जवळपास राहत असलेल्या ह्या दोन समुहातील लोकात ज्ञानाच्या बाबतीत ही तफावत का आहे? कारण मासे मारणे हा धिवरांचा व्यवसाय आहे तो गोंडांसाठी रिकाम्या वेळी करण्याचा उद्योग आहे, धिवरांचा मासे पकडण्याचा परिघ हा गोंडा पेक्षा फार मोठा आहे. धिवर मासे पकडण्यासाठी चक्क वैनगंगा नदी पर्यंतसुद्धा जातात. शास्त्रिय भाषेत सांगायचं म्हणजे मासेमारीच्या बाबतीत गोंड हे अपार्चुनिस्टीक (संधीसाधू) आहेत तर धिवर हे स्पेशालिस्ट. एखाद्या तथाकथीक अशिक्षीत व्यक्तिला इतक्या मोठ्याप्रमाणावर जीवजातींची माहिती असण्याचं कारण म्हणजे त्यांचं जीवन हे ह्या जैविक घटकांवर अवलंबून असते. ग्रिनेल नावाच्या शास्त्रज्ञाने (ऋrinnel १९८७) एस्कीमो बद्दल लिहलय, ’एस्कीमो ३० विभिन्न प्रकारच्या बर्फांना ओळखू शकतात तर १० विविध प्रकारच्या चिखलांना वेगवेगळी नावं त्यांनी दिली आहेत, त्यांचे जगणे हे ह्या फरकावरच अवलंबून आहे. पण त्यांच्या भाषेत केवळ एका फुलाचे नाव आहे!’ 
मास्यांबद्दल ज्ञान गोळा करतांना मी हे ज्ञान दोन पातळीवर गोळा करण्याचे ठरविले, एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर आणि दुसरे म्हणजे मस्त्य समुहाच्या पातळीवर. प्रजातीच्या पातळीवर म्हणजे विविक्षित अशा जाती बद्दल ज्ञान गोळा करणे; उदा. ’बोद (बगारीयस बगारीयस) ह्या मास्याच्या प्रमाणात दिवसें दीवस काय बदल होत आहेत?’ मस्त्य समूहाच्या पातळीवर म्हणजे संपूर्ण मास्यांच्या समूहाबद्दलचे ज्ञान, उदा. मास्यांच्या प्रजननाबद्दल लोकांचे ज्ञान.
लोकांच्या म्हणन्यानुसार जवळ जवळ ७२ % मास्यांच्या जाती हळुहळु का होईना संपत आहेत, २१ % जातीत कोणताही फरक पडत नाही तर ८ % प्रजातींचं प्रमाण नदीत वाढते आहे. स्थानिक जाणकारांच्या नुसार घोगर, जरांग, कडू, पिंजर आणि तंबू (अnguilla bengalensis bengalensis) ह्या जाती तर स्थानिक स्तरावर संपल्यावर जमा आहे. काय कारणांनी हे सारं घडत आहे? लोक म्हणतात की लोकसंख्यावाढीने मासेमारीचे प्रमाण वाढले. काही लोक मासेमारीकरीता विषाचा वापर करायला लागलेत. वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तर विजेच्या तारांचा वापर करुन काही लोक मासेमारी करतात. लोकसंख्यावाढीचा परिणाम शेतीतुन जास्त उत्पादन काढण्यावरही झाला परिणामत: नदीच्या पाण्याचा शेतीसाठी जास्त उपयोग व्हायला लागला. अडाण ही पैनगंगेची एक महत्वाची उपनदी, माझ्या पीएचडीची ही दुसरी नदी. ही नदी जीथे पैनगंगेला मीळते ते ठिकाण यवतमाळ जिल्ह्यातील चिमटा हे गाव. तीथले भोई लोक म्हणत होते की, ’शेतीला पाणीदेण्यासाठी नदीवर शेकडो शेतकरी आपल्या खुप जास्त हॅर्सपावरच्या मोटर लावतात आणि दिपावली पर्यंत पुर्ण नदी कोरडी होते मग मासे कोठूण राहणार? आधीच अडाण नदीवरच्या धरणाने बराच विनाश केला आता हे सधन शेतकरी, भोई, धिवर लोकांनी काय करावं?’ आधूनिक शेतीने, बाजाराच्या तणावाने आणि अतीआधूनिक शेतीने (हरित क्रांतीने) संसाधन आधारीत लोकांना देशोधडीला लावले आहे.
काही मासे हे लोक जास्त आवडीने खातात तर काही लोकांना आवडत नाहित. तसा विचार केला तर सर्वच प्रकारचे मासे खाण्यासाठी असतात. त्यातल्या त्यात बोद (ऑagarius bagarius), तंबू (ऊresh water eel), वाघूर (इlarias batrachus) सवडा (हallagu attu) हे मासे जास्त चवदार असतात तर चाचा (ङenentodon cancila) हा मासा चविच्या बाबतीत सर्वात नावडता आहे.
काही मासे हे खाण्यासोबतच औषधीसाठीही वापरल्या जातात उदा. हिचार मिन (इhanda nama) हा मासा एका विशिष्ट प्रकारच्या रोगात, ज्यात रोग्याला अंधारात दिसते पण प्रकाशात दिसत नाही, वापरला जातो. माडुम मिन नावाचा मासा मदूरी नावाच्या रोगात, ज्यात सर्वांगावर फोड येतात, वापरला जातो. वाघूर (इlarias batrachus), इंगूर आणि गट्टी (कystus sps.) हे मासे सर्वात पौष्टीक समजल्या जातात आणि आजारातून बाहेर आल्यानंतर आणि गरोदर अवस्थेत खालल्या जातात.
या व्यतीरीक्त विविध ऋतूत मास्यांच्या प्रमाणाबाबत, प्रत्येक जातीच्या अधिवासाबद्दल, लोकांना प्रत्येक जातीच्या असलेल्या महत्वाबद्दल, विविध जातींच्या सद्य प्रमाणा बद्दलही लोकांजवळ ज्ञान आहे.
आता आपण मासे ह्या एकुणच समुहाबद्दल लोकांकडे असलेल्या ज्ञानाचा विचार करु. मास्यांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचे स्थलांतर. लोकांना मी स्थलांतराच्या ज्ञानाबद्दल त्यांची समज विचारली, लोक म्हणतात: पावसाळा सुरु झाला की स्थलांतर सुरु करण्याचा मान कालामीन नावाच्या मास्याला असतो. काला मीन जणू स्थलांतराची सुरुवात करतो. त्याच्या मागोमाग अन्य मासे स्थलांतर सुरु करतात. स्थलांतराच्या कार्यात एकाच जातीचे मासे एकमेकांच्या शेपटीला पकडून नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने डोंगराकडे चढतात. आणि उंच ठिकाणी जाउन प्रजनन करतात. या काळात पकडलेले मासे अतीषय पौष्टीक असतात. हे स्थलांतराबाबतचे लोक ज्ञान आधूनिक ज्ञानासारखेच आहे.    

दुसरा मत्स्य समुहाबद्दलचा माझा प्रश्न होता मास्यांचे प्रजनन. लोकांच्या मतानुसार: प्रजननाच्या काळात मादी पिलांना जन्म देते, नर मादिच्या मागोमाग येतो आणि नवजातांवर दुध शिंपडतो, ते दुध छोटी पिलं पितात आणि त्यांची वाढ होत जाते. लोक म्हणतात की मास्यांचा जन्मदर (फेकूंडीटी) इतका जास्त असतो की एक मास्यांची जोडी एका धिवर कुटूंबाला वर्षभर मासे पुरवू शकते. सुरुवातीच्या काळात पिलं इतक्या वेगाने वाढतात की त्यांची वाढ ही साध्या डोळ्यांनीही बघता येते.