Tuesday, December 13, 2016

भारतीय विविधता आणि गुंतागुंतीला न समजुन घेणारं सरकार

अर्थशास्त्र, परिस्थितीकी शास्त्र, पर्यावरण शास्त्र या सारखी शास्त्रे गुंतागुंतीच्या व्यवस्थांचा (complex systems) अभ्यास करणारी शास्त्रे आहेत. त्यात अर्थशास्त्र तर आणखीच गुंतागुंतीच शास्त्र आहे कारण त्यावर मानवी भावना, मानसाची वागण्याची पद्धत, संस्कृती इत्यादी घटक परिणाम करतात. भल्या भल्या नोबेल पारितोषीक अर्थशास्त्रज्ञाला सुद्धा बरेचदा एखाद्या देशाचं अर्थशास्त्र पुढच्या क्षणी काय स्वरुप धारण करेल हे सांगता येत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की अर्थशास्त्र हे अगणित घटकांवर अवलंबून असलेलं शास्त्र आहे. त्या सर्व घटकांमधील सहसंबंधाची कोरीओग्राफी समजून घेणे महाकठीण कार्य असते. त्यामुळे खरी अर्थशास्त्राची, पर्यावरण शास्त्राची जाण असणारे शास्त्रज्ञ किंवा राज्यकर्ते कधीच एकच एक असा कठोर कायदा, नियम, घोषणा करुन टाकत नाहीत, तर घ्यायचा निर्णय हा लवचीकपणे टप्या टप्यात, संपूर्ण तयारीनीशी घेतात. असं जर केलं नाही तर फसणारा निर्णय एका मोठ्या लोकसंखेचं, भूभागाचं प्रचंड नुकसान करुन जातं.

“अर्थशास्त्राबद्दलची मानवी समज ही अपूर्ण असल्यामुळे राज्यकर्त्यांचा अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध हा नेहमी प्रयोगात्मक असायला हवा (Experimental). ज्यावेळी आपली गाठ ही गुंतागुंतीच्या व्यवस्थांच्या प्रश्नांशी असते त्या वेळी आपण अनुरुप व्यवस्थापनाच्या (Adaptive management) तत्वांचा अंगीकार करायला हवा. अनुरुप व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेण्यातली लवचिकता. अनुरुप व्यवस्थापन हे अर्थशास्त्रीय धोरणाला/निर्णयाला प्रयोगात्मकता प्रदाण करते. अनुरुप व्यवस्थापनाचे धोरण हे मानवाच्या क्रियाकलापांमूळे बदललेल्या अर्थव्यवस्थेबद्दल स्पष्टपणे स्थापित केलेल्या सिद्धांताचा पडताळा घेते (उदा. काळा पैसा खरच केवळ चलणाच्या स्वरुपात असतो काय? केवळ चलन रद्द केल्याने काळ्या पैशाचे प्रश्न सुटतात काय? इत्यादी). जर असे अनुरुप व्यवस्थापनावर आधारलेले निर्णय यशस्वी झाले तर सिद्धांत सत्याचं स्वरुप घेतो. सोबतच  धोरण जर अयशस्वी झाले तरी अनुरुप व्यवस्थापण त्या अपयशापासून शिकण्यासाठी जागा ठेवते जेणे करुन भविष्यकालिन निर्णय हे चांगल्या समजाच्या आधारावर घेता येतात.” (काई एन ली ने त्याच्या “कंपास अंड गायरोस्कोप” नावाच्या ग्रंथात पर्यावरणीय व्यवस्थांबद्दल जे लिहलं आहे त्याचा अर्थव्यवस्थेला लागू पडेल असा केलेला मी स्वैर विचार!).

नोटा बंदीच्या निर्णयात अशी प्रयोगात्मकता, अभ्यास, दूरदृष्टी, नियोजन कुठेच दिसत नाही. एकप्रकारची सनसनाटी निर्माण करुन काळ्या पैशाच्या बाबतीत प्रस्थापीत केलेल्या सिद्धांताची पडताळणी घेण्याची नियोजनहीन खेळी मात्र दिसून येते. भारतासारख्या विविधतेच्या आणि गुंतागुंतीच्या देशात राहणा-या करोडो लोकांशी हुकुमशाही पद्धतीने केलेला हा प्रयोग वाटतो. हा निर्णय भारतीय विविधतेचा सन्मान करत नाही, भारतीय व्यवस्थांमधली गुंतागुंत मान्य करत नाही. येणारे दिवस भारतीय शेतकरी, मासेमार, आदिवासी, मजूर, भटक्या जमाती या सर्वांसाठी अतीषय कठीण दिवस असणार आहेत.      

No comments:

Post a Comment